राजांची स्मारके !
जंगलावर राज्य
केलेल्या वाघ आणि सिंहांची कर्तबगारी काय होती, याचा हिशेब करायला
गेलो तर फारसे काही मिळत नाही. मोठी ‘प्राणीपयोगी कार्ये’ त्यांनी केली असे आढळून
आले नाही. काही हरणांची शिकार त्यांनी केली, तर काहींनी
उंदीर-घूस यांच्यावरच समाधान मानले आणि त्यालाच वीरता ठरवले. जंगलात ‘माणूस राज्य’
सुरू झाल्यावर मात्र काही वाघ शहरात शिरले; नाशिकचे सावरकर नगर
आणि पुण्यातील औंध ही त्यांची खास आवडती ठिकाणे ठरली.
पण खरी वीरता कुणी
दाखवली? छत्रपती संभाजी नगरात चेतक घोड्याने महाराणा प्रतापासाठी
प्राणांचे बलिदान दिले म्हणून त्याचे स्मारक झाले. रायगडावर शिवरायांच्या चितेवर
उडी घेणाऱ्या निष्ठावान वाघ्या कुत्र्याचे स्मारक झाले. त्यामानाने वाघ-सिंहांची
कर्तबगारी म्हणजे फक्त गर्जना आणि शिकार इतकीच!
जंगलात आग लागली
तेव्हा चिमणीने चोचीत पाण्याचे थेंब आणून ती विझवण्याचा प्रयत्न केला. त्या वेळीही
वाघ-सिंह सावलीत बसून गंमत पाहत होते. शेवटच्या टप्प्यात त्यांनी थोडेफार
व्यवस्थापनाचे काम केले, एवढेच. अलीकडेच हिरवी पाने आणि लाल फुले मोजून काकराजची निवड
झाली; हिरवी पाने जास्त असल्याने लोकशाही मार्गाने काकराज ‘जंगलचा
राजा’ ठरला. त्या वेळीही वाघ-सिंह हतबल झाले.
माणसांनी मात्र
त्यांच्या संख्येवर पर्यावरण संतुलन अवलंबून आहे असे सांगून परदेशातून वाघ-चिते
आणले, ‘आजोबा’सारखे
सिनेमे बनवले, मोठमोठी
भाषणे केली, पर्यटनास चालना मिळावी म्हणून प्रकल्प आखले. शहरांमध्ये
वाघ-सिंहांचे भव्य स्मारक उभारले गेले, पण ते त्यांच्या
कर्तबगारीसाठी नव्हे, तर माणसांच्या कल्पकतेच्या आणि कलात्मकतेच्या प्रदर्शनासाठी…!
Dr. Mahendra Ingale @
Pune on July 12, 2026
Author of Value‑Based Leadership
#EngineeringHeartBeats #ValueBasedLeadership #EngineeringDreamsInspiringSouls #अभियांत्रिकीस्पंदने #लोकशाहीचानवाराजाकाकराज
No comments:
Post a Comment