मृत्यू पत्र : सजगतेचा दस्तऐवज !
‘माणसाचे
मन केवळ भूतकळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही तर त्याला
भविष्याच्या गरुडपंखांचे वरदानही लाभले आहे. एखादे स्वप्न पाहणे, ते फुलावे म्हणून धडपडणे, त्या धडपडीतील आनंद लुटणे
आणि दुर्दैवाने ते भंग पावले तरी त्याच्या रक्ताळलेल्या तुकड्यांवरुन इतर
स्वप्नांच्या मागून धावणे हा मानवी मनाचा धर्म आहे आणि माणसाच्या जीवनाला अर्थ
येतो तो यामुळेच !’
-अमृतवेल, वि स खांडेकर
स्वप्न बघणे, शिक्षण घेणे, पद-प्रतिष्ठा प्राप्त करणे त्याकरिता अहोरात्र मेहनत करणे, संघर्ष करणे, संपत्ती मिळवणे आणि कर्तृत्व सिद्ध करणे हा मानवी आयुष्याचा पट आहे. जीवन आहे तो पर्यंत संघर्ष आहे. आशा-आकांक्षांच्या पूर्तिकरता शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणे यात काही गैर नाही. पण जीवन म्हणजे एक भातुकलीचा खेळ हे भान ठेवणेही आवश्यक आहे. हा खेळ अहमहकिने खेळला जातो. आपण अर्जित केलेली संपत्ती, संपादित केलेली मालमत्ता, उभारलेला व्यवसाय ही या खेळातील खेळणी आहेत. शेवटी ती दुसऱ्यांच्या हाती सोपवायची आहे याचे भान मृत्यूपत्र देते. यात आपण ठरवतो की कोणत्या खेळण्याचा वारसा कोणाला मिळावा. “उद्या जावे लागेल” हा विचार ठेवला तर जीवन अधिक परिपूर्ण होते. मृत्यूचे भान ठेवणारा मनुष्यच खऱ्या अर्थाने भरभरून जगतो.
भारतामध्ये
संपत्ती वाटपाचे प्रचलित कायदे आहेत, पण ते अनेकदा
गुंतागुंतीचे ठरतात. आपण अर्जित केलेल्या संपत्तीने कौटुंबिक कलह निर्माण होण्याचे
टाळायचे असतील तर मृत्यूपत्र आवश्यक आहे. मृत्यू पत्र म्हणजेच ईच्छापत्र. ज्यांना
मृत्यूची भीती वाटते त्यांच्या करिता हा शब्द अधिक सोयीचा आहे. मृत्यूविषयीची भीती
कमी करण्याचे अनेक मार्ग आहेत. झोपताना नियमित शवासन करणे हा त्यापैकी एक. मृत्यूपत्र
लिहिणे म्हणजे मृत्यूला स्वीकारणे, त्याला घाबरणे नाही.
हयातीत संपत्तीचे वाटप करणे आणि मृत्यू पत्राद्वारे ते करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. व्यवसाय पुढच्या पिढीकडे पूर्णपणे सोपविला जाऊ शकतो, कारण त्यात सातत्य आणि विकास आवश्यक असतो. पण संपत्तीचे हयातीत वाटप करताना जर आर्थिक स्वातंत्र्यावर गदा आली, तर व्यक्तीला स्वतःच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते, ‘नटसम्राट’ सारखी अवस्थ होण्याची भीती असते. म्हणूनच व्यवसाय हस्तांतरित करणे योग्य, पण संपत्तीचे वाटप मृत्यूपत्राद्वारे करणे अधिक शहाणपणाचे ठरते.
आयुष्याच्या एका टप्प्यावर पोहचल्यावर मृत्यूपत्र करून ठेवावे. दुसऱ्या टप्प्यावर, परिस्थिती बदलली तर ते पुन्हा नव्याने करता येते. मृत्यूपत्र लिहल्याने, ज्यांनी आपल्यावर जिवापाड प्रेम केले, ज्यांच्यामुळे जीवनात आनंदाचे क्षण निर्माण झाले, त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळते.
मृत्यूपत्राने संपत्तीचे सुस्पष्ट वाटप करता येते. कुटुंबातील वादविवाद टाळता येतात. परदेशात राहणाऱ्या मुलांना कायदेशीर संरक्षण मिळते. मृत्यूपत्र कर्तृत्वाचा सन्मान करते. कुटुंबाला शांती मिळवून देते.
मृत्यू पत्र हे केवळ संपत्तीचे वाटप नाही, तर जीवनाच्या शेवटच्या टप्प्याला सजगतेने सामोरे जाण्याची तयारी आहे. ते आपल्याला शिकवते की मृत्यूचे भान ठेवून जगणारा मनुष्यच खऱ्या अर्थाने भरभरून जगतो.
Dr. Mahendra Ingale @
Pune on August 6, 2026
Author of Value‑Based Leadership
#EngineeringHeartBeats
#ValueBasedLeadership #EngineeringDreamsInspiringSouls #ValueBasedADRAndCounsellingServices