Sunday, June 28, 2026

स्नेहसरींचे अविस्मरणीय क्षण !

 स्नेहसरींचे अविस्मरणीय क्षण !

महाराष्ट्र राज्य कृतिशील निवृत्त अधिकारी‑कर्मचारी संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा सदाशिव पेठेतील उद्यान कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभेचे अध्यक्षस्थान मा. श्री. चंद्रकांत दळवी यांनी भूषविले, तर प्रमुख उपस्थितीत श्री. शेखर गायकवाड, श्री. उमाकांत दांगट आणि श्री. व्यंकटेश गायकवाड होते.

सभेत निवृत्त अधिकारी‑कर्मचारी यांच्या हिताचे अनेक महत्त्वाचे विषय चर्चिले गेले. महाराष्ट्र शासनाने निवृत्तांच्या समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र विभाग निर्माण करावा, महागाई निर्देशांक लक्षात घेऊन आठव्या वेतन आयोगात निवृत्तांसाठी तरतूद व्हावी, तसेच संघटनेच्या वाढीत सदस्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा—अशा ठरावांवर सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. यामुळे निवृत्तीवेतन वेळेवर मिळेल, महागाई निर्देशांकानुसार त्यात वाढ होईल आणि उद्भवणाऱ्या समस्यांचे तातडीने निराकरण करता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

सभेतील विशेष आकर्षण ठरले ते यशदाचे अतिरिक्त महासंचालक श्री. शेखर गायकवाड यांचे रंजक भाषण. शासकीय अधिकारी म्हणून आलेले अनुभव त्यांनी नर्म विनोदी शैलीत मांडले आणि उपस्थितांना आनंदित केले.

इंजि. मनोहर पोकळे, श्री. रवींद्र धोंगडे, श्री. प्रवीण शेटे, श्री. नामदेव मोहिते आणि इंजि. साहेबराव पाटील यांच्यासह अनेक सहकारी व स्नेहीजनांची आनंददायी भेट घडली. या सहवासाने सभेचे वातावरण अधिक स्नेहपूर्ण झाले.

सहकाऱ्यांच्या भेटीचा आनंद आणि पावसाच्या सरींचा स्पर्श यामुळे वातावरण हर्षोल्हासाने भरून गेले, ते क्षण अविस्मरणीय बनवून गेले!

Dr. Mahendra Ingale @  Pune on June 28, 2026
Author of
Value‑Based Leadership

#ValueBasedLeadership #EngineeringHeartBeats #EngineeringDreamsInspiringSouls #अभियांत्रिकीस्पंदने


Tuesday, June 23, 2026

शांततेतील संवाद !

शांततेतील संवाद !

पाऊस पडून गेल्याने वातावरणात गारव्याची हलकी झुळूक पसरली आहे. मध्यरात्र उलटून गेली आहे. बरीचशी शांतता आहे.

थोडी रपेट मारावी म्हणून काव्यरत्नावली चौकापासून चालायला सुरुवात केली. हा चौक नेहमीच काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो—महत्वाच्या दिनविशेषांचे फलक येथे लावले जातात. आज महेश नवमीच्या शुभेच्छा देणारे झगमगते फलक नजरेस पडले.

कॉनक्रीटच्या प्रशस्त रस्त्यावरून पुढे जाताना दिवसभराच्या गजबजाटात दुर्लक्षित राहणाऱ्या अनेक गोष्टी डोळ्यांसमोर आल्या. त्या जणू संवाद साधण्याचा प्रयत्न करीत होत्या. अधिकाऱ्यांचे प्रशस्त बंगले, आकाशवाणी चौक, जिल्हाधिकारी कार्यालय व त्यासमोरील  बांधकाम भवन,  स्वातंत्र्य चौक व तेथील स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा, बस स्थानक, पोलिस मुख्यालय, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडासंकुल, जी. एस. ग्राउंड, छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी अश्वारूढ पुतळा, सिविल कोर्ट,  पंडित जवाहरलाल नेहरूंचा पुतळा आणि तेथून दिसणारे जळगाव रेल्वे स्टेशन. साधारण दोन अडीच किलोमीटरचे हे अंतर.

परतांना, नेहरूंच्या पुतळ्याजवळ थोडा थबकलो. १९६५ मध्ये जळगाव नगरपालिकेने हा सुंदर संगमरवरी पुतळा उभारला—जळगावच्या वैभवात भर घालणारा!

परवा विवेक सावंतांचे नेहरूंवरील भाषण ऐकले होते. MKCL चे कार्यकारी अधिकारी राहिलेले सावंत यांचे अभ्यासपूर्ण पण सहज संवाद वाटावा असे ते भाषण. त्याची आठवण तिथे उभी राहिली.

आणि मग आठवणींची साखळी सुरू झाली—जळगाव पॉलिटेक्निकमध्ये शिकत असताना, हॉस्टेलच्या मित्रांसोबत परीक्षा काळात मध्यरात्रीनंतर सायकलवरून रेल्वे स्टेशनजवळील ‘ब्रिजविलास’ रेस्टॉरंट मध्ये चहासाठी जाण्याची. तसेच मुंबईत ग्रँट रोडवरील ‘दिल्ली दरबार’ हॉटेलपासून अंधेरीतील SPCE हॉस्टेलपर्यंतच्या मध्यरात्रीनंतर सुरू केलेल्या ‘लाँग वॉक’ ची!

त्या आठवणींनी रात्रीच्या शांततेत आणखीनच गारवा निर्माण केला!

Dr. Mahendra Ingale @  Jalgaon on June 24, 2026
Author of 
Value‑Based Leadership

 #ValueBasedLeadership #EngineeringHeartBeats #EngineeringDreamsInspiringSouls #अभियांत्रिकीस्पंदने

 

Monday, June 22, 2026

Shantaram: A Personal Revisit

 Shantaram: A Personal Revisit

While rearranging the books in my bookcases at Jalgaon, my hands lingered on Shantaram—Gregory David Roberts’ sprawling 936‑page autobiographical novel. Instantly, a tide of memory rose within me: the moment I first bought the book in 2004, the long nights spent reading it, and the echoes of my student days in Mumbai during the eighties.

Roberts’ life itself is a narrative of extremes. Once an armed robber who escaped from prison in Australia, he drifted into Mumbai and lived for years in the slums of Colaba under the adopted name Shantaram. There he opened a free health clinic, worked with the underworld and politicians, fell in love, acted in Bollywood, and even fought alongside mujahideen in Afghanistan. His journey carried him to Germany, where he was captured and extradited to Australia. After serving his sentence, he rebuilt his life, founded a small media company, and devoted himself entirely to writing.

The book is a testament to endurance. It took him thirteen years to complete, and the first six years of work—six hundred pages—were destroyed in prison. Yet he persisted, producing a novel written, as he himself said, in blood and tears.

What draws me most is his language: lucid yet layered, with sentences so long they seem to resist comprehension, but once embraced, they touch the heart with startling clarity. Consider his reflection: “Fate needs accomplices, and the stones in destiny’s wall are mortared with small and heedless complicities such as those. I look back, now, and I know that the naming moment (Shantaram), which seemed so insignificant then, which seemed to demand no more than an arbitrary and superstitious ‘yes’ or ‘no’, was pivotal in my life.”

His philosophical commentary transforms incidents into insights. Early in the book, he describes himself with stark honesty: “I was a revolutionary who lost his ideals in heroin, a philosopher who lost his integrity in crime, and a poet who lost his soul in a maximum‑security prison.”

Reading Shantaram resonates deeply with me because Roberts was in Mumbai during the same years I lived there. I too glimpsed some of the scenes he describes:

The calm streets at night, Nariman Point’s necklace illuminating the horizon, the waves and cool, salty breeze of the Arabian Sea at Girgaon Chowpatty. The Mahalaxmi Temple, radiant in its silver glow, spreading its spiritual aura. Haji Ali, standing boldly amidst the waters, its white dome glowing softly against the night sky. Mahim Church, with its graceful silhouette, inviting quiet reflection. Bandra’s seaside road, with the iconic Sea Rock Hotel rising tall against the shimmering waters. And Juhu beach, woven into the fabric of daily life, brimming with vitality: coconut trees leaning toward the waves, hotels like Sun‑n‑Sand and Horizon framing the shore, crowds of people engaged in countless activities. It was a world alive with movement and memory, and all of it found its way into my books.

Pat Conroy says:

“Gregory David Roberts does for Bombay what Lawrence Durrell did for Alexandria, what Melville did for the south seas, what Thoreau did for Walden Pond: he makes it an eternal player in the literature of the world.”

Thus, returning to Shantaram is not simply reading—it is reliving. The novel soothes me, carrying me back into a world I once inhabited physically, and still inhabit mentally whenever memories rise from the depths of the heart.

Dr. Mahendra Ingale @  Jalgaon on June 22, 2026
Author of Value‑Based Leadership


 #ValueBasedLeadership #EngineeringHeartBeats #EngineeringDreamsInspiringSouls #Shantaram #
अभियांत्रिकीस्पंदने

 

Sunday, June 21, 2026

लोकशाहीचा नवा राजा: काकराज !

लोकशाहीचा नवा राजा: काकराज!

एके दिवशी, घराच्या खिडकीवर बसलेल्या कावळ्याने, घरातील लोकांची आपल्या मुलाला उच्च शिक्षणाकरिता परदेशात पाठविण्याची चर्चा ऐकली. त्यातून प्रेरणा घेऊन त्याने आपल्या मुलाला, काकराजला परदेशात शिकायला पाठवायचे ठरविले. 

काकराज अतिशय हुशार आणि कल्पक होता. मटक्यातील पाणी पिण्यासाठी, पाण्याची खाली गेलेली पातळी वर आणण्याकरिता त्यात दगड गोटे टाकण्याऐवजी स्ट्रॉ वापरून ते कसे प्यायचे हे त्याने प्रात्येक्षिकासह सगळ्यांना समजाऊन सांगितले होते. त्याची ही कल्पकता बघून कावळे आश्चर्यचकित झाले होते आणि त्यांनी त्याच्या बुद्धिमत्तेचे व व्यवहार चातुर्याचे कौतुक केले होते.


काकराज जागतिक दर्जाच्या विद्यापीठामधून व्यवस्थान शास्त्रात उच्च शिक्षण घेऊन परतल्यावर कावळ्यांच्या जमातीने त्याचा मोठा सत्कार केला. सर्वांचे आभार मानून
, सत्काराला उत्तर देताना त्याने सांगितले:

"आपण आता लहानसहान गोष्टींमध्ये अडकून राहायचे नाही. मोठी स्वप्ने पाहायची आणि ती साकारण्यासाठी नाविन्यपूर्ण पद्धतींचा उपयोग करायचा. हे संपूर्ण जंगल आपल्या मालकीचे झाले पाहिजे. चिमणीचे घरटे मिळविण्यासाठी व्यर्थ वेळ घालवायचा नाही. उलटपक्षी चिमण्या आणि जंगलातील इतर पशुपक्षी, प्राणी यांना आपल्या सोबत घ्यायचे. त्यांना आपले विचार पटवून द्यायचे. जग झपाट्याने बदलत आहे, आपणही बदलले पाहिजे. तंत्रज्ञानाचा उपयोग करून प्रगती केली पाहिजे."

त्याचे हे विचार अनेकांकरीता नवीन होते. काही जेष्ठ कावळ्यांनी नाराजीही व्यक्त केली. कारण यापूर्वी कावळ्यांनी कधी इतर पशू पक्ष्यांशी संवाद साधला नव्हता आणि अशा पद्धतीचा विचार केला नव्हता. पण लोकशाहीत सार्वमत बनविण्याची ही पद्धत आहे हे काकराजने त्यांना पटवून दिले.

त्याने आपल्या थोर परंपरे विषयीही सांगितले: 

"आपली परंपरा फार थोर आहे. शतकांपूर्वी, कृष्ण द्वीपात राहून न्याय आणि नीती शास्त्र विद्या प्राप्त करून त्यात पारांगत झालेले आपले पुर्वज काककुमार यांनी मानस सरोवरातील हंसांना न्याय आणि नीतीचे दाखले देवून लोकशाही मार्गाने त्यांच्या कडून सत्ता हस्तगत केली होती. 

आपण ज्या घराच्या दारावर बसतो तेथे पाहुणे येतात. आपण पाहुणचाराचे प्रतीक आहोत. आपण पितरांचे संदेशवाहक आहोत. आपण पिंडाला शिवल्याशिवाय माणसाला मोक्ष प्राप्त होत नाही. एवढे आपले महत्व आहे. एवढे आपण थोर आहोत. तेव्हा जंगलावर आपला निसर्गदत्त अधिकार आहे."

आता सर्व कावळ्यांनी काकराजला पाठिंबा जाहीर केला.
त्याने इतर वनचरांशी संवाद साधला:

"चिमण्यांनो, किती दिवस काडी-काडी गोळा करून झाडांवर घरटी बांधणार?
कबुतरांनो, तुम्ही संदेश वाहक, शांती दूत ! तुम्हाला त्याची काय बक्षीशी मिळाली?
माकडांनो, किती दिवस उड्या मारत राहणार? पर्यटकांच्या हातातील चीजवस्तू हिसकावून घेण्यातच आयुष्य घालवणार?
सुग्रीणींनो, तुमच्या सुंदर विणलेल्या घरट्याची परदेशात किती वाखाणणी होईल, याची तुम्हाला कल्पना आहे का?
आपल्या कष्टाचे, आपल्या कलाकौशल्याचे खरे मूल्य जाणून घ्या.
आपल्या श्रमांमध्येच आपली ओळख आहे, आणि त्या ओळखीला मी जगभरात मान मिळवून देईन. नव्या व्यवस्थेत, तुमच्या प्रत्येकाकरिता माझ्याजवळ आकर्षक योजना आहे.”

त्याच्या भाषणाने सर्वजण अंतर्मुख झाले. सर्वांनी आपला एकमुखी पाठिंबा जाहीर केला.

कबुतरांनी धुत्कार, घुबडांनी चीत्कार, चिमण्यांनी चिव चिव करून आनंद व्यक्त केला. मोर-लांडोरच्या नृत्याने कार्यक्रमाची सांगता झाली.

यानंतर काकराजने  वाघ आणि सिंह वगळता सर्व पशू, पक्षी आणि प्राण्यांची बैठक बोलावली. काही वाघ हे सिंहाविषयी पूर्वीपासूनच नाराज होते. त्यांनी बैठकीस गुप्त पाठिंबा दिला. या बैठकीत काकराजची जंगलचा राजा म्हणून निवड व्हावी असा ठराव करण्यात आला. गरुडाने विरोध केला: "सिंह हा जंगलाचा राजा आहे. तो सामर्थ्यशाली आहे, आपण त्याच्या बरोबरीचे नाही." पण गरुडांची संख्या फारच कमी असल्याने त्याचे मत दुर्लक्षित झाले. ठराव बहुमताने संमत झाला.

निवडीचा ठराव सिंहापर्यंत पोहोचविण्यात आला. सिंह संतापला: "मी हे स्वीकारणार नाही." त्याने वाघ, बिबटे, कोल्हे, अस्वले यांची मदत मागितली, पण ते मदतीस आले नाहीत.

काकराजने सिंहाच्या गुहेबाहेर सभा घेतली:

मी लोकशाही मानतो. परदेशात असताना मी लोकशाही राज्य व्यवस्थेचा सखोल अभ्यास केला आहे. ती जगातील सर्वात चांगली राज्य पद्धती आहे. त्यात प्रत्येकाच्या कल्पकतेला आणि कर्तृत्वाला वाव आहे. येथे सर्वांना राजा बनण्याची संधी आहे. उद्या तुमच्यापैकी कोणीही राजा होऊ शकतो.

आपण सर्वजण सभ्य संस्कृतीचे वारसदार सभ्य आहोत. सभ्य संस्कृतीत हिंसाचाराला स्थान नाही. माझ्याकडे संपूर्ण जंगलाचा नाश करू शकतील अशी घातक अस्त्रे आहेत पण मी ती वापरणार नाही कारण हिंसाचारात माझा विश्वास नाही. सहमतीकरिता शांततेचा मार्ग मला अधिक चांगला वाटतो.

त्याचे हे अभ्यासपूर्ण पण तेव्हढेच आवेशपूर्ण भाषण ऐकून उपस्थितांच्या अंगात उत्साह संचारला. ते काकराजचा जयजयकार करू लागले. जोर जोरात घोषणा देवू लागले. काहींना तर आपण राजा झालो आहे असा भास होऊ लागला. 

उपस्थितांना शांत राहण्याचे आवाहन करून, काकराज शांततेने आणि आत्मविश्वासाने पुढे बोलू लागला:

 जंगलाचा राजा कोण हे लोकशाही पद्धतीने ठरायला पाहिजे. ज्याला सिंह राजा वाटतो त्याने लाल फूल आणावे. ज्याला काकराज राजा वाटतो त्याने हिरवे पान आणावे ." 

थोड्याच वेळात तेथे हिरव्या पानांचा ढीग जमा झाला. 

काकराज लोकशाही मार्गाने जंगलाचा राजा झाला. 

नद्या-सरोवरांवर हंस आणि बगळ्यांची तर वृक्ष-वेलींवर  चिमण्या आणि पोपट यांची सत्ता स्थापित झाली. भूप्रदेश वाघ आणि बिबट्याच्या ताब्यात दिला गेला. 

कबुतरांना शांती मंत्रालय, माकडांना पर्यटन विभाग, मोरांना सांस्कृतिक कार्यक्रमांची जबाबदारी देण्यात आली.


Dr. Mahendra Ingale @  Jalgaon on June 21, 2026
Author of Value‑Based Leadership


 #ValueBasedLeadership #EngineeringHeartBeats #EngineeringDreamsInspiringSouls #अभियांत्रिकीस्पंदने

Thursday, June 18, 2026

Author of Value-Based Leadership !

 Author of Value-Based Leadership !

गेल्या वर्षी, दीर्घकाळ विचाराधीन असलेल्या विषयावर, मी पुस्तक लिहायला सुरुवात केली—शासकीय सेवेत सन्मानाने जगा!” परंतु लिहिताना जाणवले की हा विषय केवळ शासकीय सेवेपुरता मर्यादित ठेवणे योग्य नाही. स्थळ‑काळाच्या चौकटीतही तो अडकू नये. म्हणून पुस्तक लेखन थांबवले. परंतु विविध विषयांवर ब्लॉग लिहणे सुरू होते. प्रामुख्याने इंग्रजीत.

तंत्रज्ञानातील झपाट्याने होणारी प्रगती, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील संशोधन, आणि त्याचा सामाजिक, राजकीय व आर्थिक क्षेत्रावर होणारा परिणाम यामुळे मानवी जीवनात व्यक्ती म्हणून आणि समुदाय म्हणून होत असलेले बदल मला प्रकर्षाने जाणवत होते. मानवी जीवन अधिक सुखकर व्हावे याकरिता तंत्रज्ञानाचा उपयोग, जीवनाच्या मूळ प्रेरणा आणि काळानुरुप त्यात होणारे बदल, शाश्वत मूल्ये आणि त्यांचे संवर्धन यावर लिहिण्याची प्रेरणा झाली. त्यातून Value‑Based Leadership हे पुस्तक साकारले.

या पुस्तकात “Living with Dignity in Government Service” हे एक प्रकरण समाविष्ट केले. यात ज्या प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांविषयी लिहले आहे, त्यांच्या कार्याचा गौरव होत आहे हे बघून समाधान वाटते.

अनेक मान्यवरांनी पुस्तकाचे परीक्षण केले; काही वृत्तपत्रांत प्रकाशित झाले, तर काही सोशल मीडियावर प्रसारित झाले. पुस्तकातील अनेक प्रकरणे सोशल मीडियावर उपलब्ध असल्याने वाचकांनी त्यांचे प्रिंट‑आउट्स काढले आणि आपल्या उद्योग‑व्यवसायात मार्गदर्शन म्हणून उपयोग केला.

आम्ही हे पुस्तक प्रमुख भाषांमध्ये भाषांतरित करतो, ऑडिओ‑बुकच्या स्वरूपात आणतो, तसेच काही प्रकरणांवर आधारित चित्रपट निर्मिती होऊ शकते असे प्रस्ताव आले. पण सुरवतीपासूनच, या पुस्तका करिता Organic Digital Marketing with Passive Mode  ही Strategy अवलंबली असल्याने ते अद्याप स्वीकारलेले नाहीत.

दिवसाआड कोणी ना कोणी या पुस्तकाविषयी माझ्याशी संवाद साधत असतो. त्यामुळे “Author of Value‑Based Leadership” ही ओळख धारण करणे मला आवडायला लागले आहे !

वाचक म्हणून आपल्याशी केलेला असा सुसंवाद माझ्याकरिता आनंददायी ठरतो.

Dr. Mahendra Ingale @ Jalgaon on June 19, 2026

Author of “Value-Based Leadership” mvingale2405@gmail.com

#EngineeringHeartBeats #ValueBasedLeadership #EngineeringDreamsInspiringSouls

सत्य पराभूत होऊ शकते का?

सत्य पराभूत होऊ शकते का?

कम्प्युटर इंजिनिअर म्हणून सुरेशला अमेरिकेत येऊन वीस वर्षांहून अधिक काळ झाला आहे. सध्या तो एका सॉफ्टवेअर कंपनीत AI इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेटा सेंटर उभारणीच्या कामात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

कॅलिफोर्नियातील पिनॅकल्स नॅशनल पार्कमध्ये सुटीच्या दिवशी फिरत असताना त्याच्या मनात सहज विचार आला..... तो मुंबईत महाविद्यालयात शिकत असताना एक निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांची विचार करण्याची पद्धत, त्यांच्या भावभावना जाणून घेणे आणि त्यानुसार भविष्यातील अभ्यासक्रम ठरविणे हा होता. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आवडीचा विषय निवडून त्यावर अर्ध्या तासात निबंध लिहायचा होता.

सुरेशने उत्स्फूर्तपणे यात भाग घेतला होता. त्याने निवडलेला विषय होता—

सत्य पराभूत होऊ शकते का?”

सत्याचा शोध प्रामुख्याने तत्त्वचिंतक आणि अध्यात्माच्या वाटेवर चालणारे संत-महात्मे घेत असतात. त्यांना जे आकलन होते ते समाजापुढे आणि अनुयायांसमोर मांडतात. परंतु ते अनेकदा सत्याचे कवडसेच असतात. पूर्ण सत्य नव्हे. हे कवडसेही  उपयुक्त ठरतात.

सत्य हे शब्दातीत आहे; ते केवळ अनुभवाद्वारेच जाणता येते.

ज्यांना पूर्ण सत्य गवसते ते बोलत नाहीत. ते मौनात जातात. हे मौन दोन प्रकारचे असू शकते.        

आध्यात्मिक मौन : जे सत्य अनुभवतात, त्यांना जाणवते की सत्य हे शब्दातीत आहे; ते अनुभवानेच जाणता येते. ते व्यक्त करायला शब्द अपुरे आहेत; त्यामुळे ते मौनात जातात.  

राजकीय मौन : सत्ता आणि व्यवस्था यांची ताकद समजल्यावर काहींच्या  मनात भीती निर्माण होते. सत्याचा प्रखर आणि भेदक प्रकाश त्यांच्या डोळ्यांसमोर अंधार निर्माण करतो. सत्ता हेच सत्य असा त्यांचा भ्रम होतो. अधिक भीती आणि भ्रम निर्माण होऊ नये म्हणून त्याविषयी बोलण्या ऐवजी ते मौन स्वीकारतात.

अनेकजण स्वतःहून सत्याचा शोध वगैरे घेण्याच्या फंदात पडत नाहीत. दैनंदिन व्यापात तेव्हढा वेळ त्यांच्या कडे नसतो. पण अनेकदा विवस्त्र स्वरूपात सत्य त्यांच्या समोर उभे ठाकते. आणि त्यांना त्यास सामोरे गेल्या शिवाय गत्यंतर राहत नाही.

सत्य परभूत होऊ शकते, कारण स्वतःचे आणि अनुयायांचे रक्षण करण्याचे सामर्थ्य त्याच्याकडे नसते.

सत्याचा जय किंवा पराजय हा त्याच्या अनुयांच्या क्षमतेवर अवलंबून असतो.

सत्याचे आचरण केल्यास आत्मबल निर्माण होते, आणि तेच सत्याला विजय मिळवून देण्यास उपयुक्त ठरते.

व्यक्तिमत्त्वाला अंतर्बाह्य झळाळी प्राप्त व्हावी असे ज्यांना वाटते त्यांनी सत्याचे आचरण करण्यास हरकत नाही.

सत्याचा शोध घेण्याचे अनेक मार्ग आहेत, त्यापैकी तपश्चर्या हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. तपश्चर्या वनात जाऊनच नाही तर घराच्या चार भिंतीत किंवा कार्यालयाच्या दालनात ही करता येवू शकते.

काहीसे असे विचार त्याने आपल्या निबंधातून मांडले होते.

निबंध स्पर्धेचा निकाल राखून ठेवण्यात आला होता. सुरेश महाविद्यालयात असे पर्यंत तो लागला नव्हता.

पार्कमधून बाहेर पडून, आपल्या मोटारीत बसतांना सुरेशच्या मनात पुन्हा तोच प्रश्न निर्माण झाला—

सत्य पराभूत होऊ शकते का ?

त्याच बरोबर आणखी एक विचार त्याच्या मनात आला - 

सत्य शोधण्यात AI चा कसा उपयोग करता येईल ?”

हा  विचार मनात घेऊन तो आपल्या बंगल्याच्या दिशेने निघाला.

Dr. Mahendra Ingale @ Jalgaon on June 18, 2026

Author of “Value-Based Leadership mvingale2405@gmail.com

#EngineeringHeartBeats #ValueBasedLeadership #EngineeringDreamsInspiringSouls

Saturday, June 13, 2026

यात्रा समृद्ध जपानची – जळगावच्या परिवर्तनाची दिशा

यात्रा समृद्ध जपानची – जळगावच्या परिवर्तनाची दिशा

पुण्यातील, विशेषतः पिंपळे सौदागरमधील सततच्या घडामोडींनी गजबजलेल्या जीवनानंतर जळगावला परतल्यावर मनात सहज प्रश्न उमटतो – जळगावची आकर्षणे काय आहेत 

उत्तर मिळते: 

ओंकारेश्वर मंदिर – जळगावच्या वैभवाचा आधार आणि तेथील शांतता

भाऊचे उद्यान- तेथील हिरवाई आणि तेथील चैतन्य

भरतदादा अमळकर- समप्रित आणि प्रेरणादायी  व्यक्तिमत्त्व 

आजच्या कार्यक्रमात – यात्रा समृद्ध जपानची’ या अभ्यास दौऱ्याच्या संदर्भात डॉ. भरतदादा अमळकर आणि सौ. हेमाताई अमळकर यांनी अतिशय उत्तम सादरीकरण केले. जपान म्हणजे शिस्त, तंत्रज्ञान, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक परिवर्तन यांचा अदभूत  संगम – हे त्यांनी उदाहरणांसह आणि चित्रफितींच्या माध्यमातून आपल्या नेहमीच्या खुमासदार शैलीत सादर केले.

त्या अनुषंगाने त्यांनी देशातील सद्यस्थितीतील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचे विवेचन केले आणि परिवर्तनाच्या प्रक्रियेवर प्रकाश टाकला. अभिमानाची बाब म्हणजे ते या प्रक्रियेचे कृतीशील घटक आहेत.

कार्यक्रमाआधी, अनेक मान्यवरांसह महापौर सौ. दीपमालाताई काळे यांची भेट झाली. त्यांच्या कार्यास शुभेछ्या दिल्या. 

आगामी काळात सामाजिक संस्था आणि राजकीय नेते भरतदादा अमळकर यांचे मार्गदर्शन घेतील आणि जळगावला वैभवाच्या शिखरावर पोहोचवतील, अशी आशा मी बाळगतो.

Dr. Mahendra Ingale @ Jalgaon on June 13, 2026

Author of “Value-Based Leadership” mvingale2405@gmail.com

#EngineeringHeartBeats #ValueBasedLeadership #EngineeringDreamsInspiringSouls

 

 

 

स्नेहसरींचे अविस्मरणीय क्षण !

 स्नेहसरींचे अविस्मरणीय क्षण ! महाराष्ट्र राज्य कृतिशील निवृत्त अधिकारी‑कर्मचारी संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा सदाशिव पेठेतील उद्यान कार्य...