Thursday, July 23, 2026

वारी : श्रद्धा, समर्पण आणि मानवतेचा उत्सव !

      वारी : श्रद्धा, समर्पण आणि मानवतेचा उत्सव !

वारी म्हणजे पांडुरंगाचे, परमेश्वराचे साकार-निराकार स्वरूप!

वारी म्हणजे भक्तिभाव आणि चैतन्याचा संगम!

वारी म्हणजे चांगुलपणावरील विश्वास दृढ करणारी अनुभूती!

वारी म्हणजे श्रद्धा, समर्पण आणि मानवतेचा उत्सव!

भक्तांना पांडुरंगाच्या भेटीची जेव्हढी आस, तेव्हढीच पांडुरंगाला भक्तांच्या भेटीची आस!

भक्त आणि परमेश्वर यातील परस्पर आकर्षण हेच वारीचे वैशिष्ट्य !

भागवत एकादशीपासून सुरू होणाऱ्या वाऱ्या संपूर्ण आसमंताला चैतन्याने भरून टाकतात. वारीचा मार्ग आपल्या लयीत चालू लागतो! वृत्तपत्रे आणि डिजिटल माध्यमे रोज वारी कुठे पोहोचली याची माहिती देतात. कुठे गोल रिंगण झाले, कुठे माऊलीचा अश्व भरधाव धावला याची वर्णने येतात. काही जण सायकलीवरून गटाने निघतात, काही पायी दिंडीत सहभागी होतात- ही दृश्ये मनाला चैतन्याच्या प्रवाहात सामावून घेतात, आणि वारीचा अनुभव अंतर्मनात जिवंत होतो.

वारीत चालणे म्हणजे चांगुलपणावरील विश्वास, परस्परांवरील प्रेम आणि आदरभावाचे प्रगटीकरण. "मी" आणि "तू" यातील भेद विसरून "आपण" या भावनेत विलीन होणे, एकमेकांना "माऊली" म्हणून संबोधणे, आदराने वाकून नमस्कार करणे, फुगड्या खेळणे, दैनंदिन कष्ट विसरून "राम कृष्ण हरी"च्या गजरात तल्लीन होणे—हे सर्व अलौकिक अनुभव आहेत.

एकट्याने पांडुरंगाचे दर्शन घेणे हा एक वेगळा अनुभव आहे, तर वारीत चालत असताना वरकऱ्यांमध्ये पांडुरंगाचे स्वरूप पाहणे हा दुसरा. वारी म्हणजे केवळ चालणारे वारकरी नव्हे, तर पलाख्या, दिंड्या, पताका, रिंगण, फुगड्या, जयघोष, चैतन्याने भरलेला आसमंत, नद्या-नाले, ओहळांचे प्रवाह, उपहारगृहे, पोलिसांचा बंदोबस्त, वाहिन्यांचे कॅमेरे—हे सर्व मिळून वारीचे रूप अधिक व्यापक होते.

प्रकृति निर्गुण प्रकृति सगुण । दीपें दीप पूर्ण एका तत्त्वें ॥ हे सांगणाऱ्या श्री संत मुक्ताबाई, पुंडलिकाच्या अंगणात प्रगट झालेल्या विठ्ठलाच्या भेटीला भक्तजनांसोबत निघाल्या आहेत. या वर्षी भक्तजनांनी त्यांना चांदीच्या रथात विराजमान केले आहे.

Dr. Mahendra Ingale @  Pune on July 23, 2026
Author of 
Value‑Based Leadership 

#EngineeringHeartBeats #ValueBasedLeadership #EngineeringDreamsInspiringSouls #अभियांत्रिकीस्पंदने

 

Saturday, July 18, 2026

अभिनयाचा जयजयकार !

अभिनयाचा जयजयकार !

तो माणूस होता…

माणसासारखा बोलायचा,

माणसासारखा वागायचा

माणूसपण किती होते,

सांगता येणार नाही.

 

नंतर तो अभिनेता झाला…

अभिनेत्यासारखा बोलू लागला,

अभिनेत्यासारखा वागू लागला.

अभिनय किती होता,

सांगता येणार नाही.

 

काळ पुढे सरकला…

तो उत्तम अभिनेता बनला.

लोकांनी जयजयकार केला.

 

तो अतिउत्तम झाला…

अधिक जोराने जयजयकार झाला.

 

आता तो खरोखरीचा अभिनेता झाला...

खाजगी जीवनात अभिनय उतरला,

सार्वजनिक जीवनातही तो झळकला!

 

माणूसपण हरवले, अभिनय गुण प्रगटले.

ते खुश होते… लोकही खुश होते.

 

गेल्यावर ते,

लोकांनी जयजयकार केला.

मोठ्याने केला… अभिनयपूर्वक केला!

 

Dr. Mahendra Ingale @  Pune on July 18, 2026
Author of 
Value‑Based Leadership

#EngineeringHeartBeats #EngineeringDreamsInspiringSouls #अभियांत्रिकीस्पंदने

 

 

Sunday, July 12, 2026

राजांची स्मारके !

राजांची स्मारके !

जंगलावर राज्य केलेल्या वाघ आणि सिंहांची कर्तबगारी काय होती, याचा हिशेब करायला गेलो तर फारसे काही मिळत नाही. मोठी ‘प्राणीपयोगी कार्ये’ त्यांनी केली असे आढळून आले नाही. काही हरणांची शिकार त्यांनी केली, तर काहींनी उंदीर-घूस यांच्यावरच समाधान मानले आणि त्यालाच वीरता ठरवले. जंगलात ‘माणूस राज्य’ सुरू झाल्यावर मात्र काही वाघ शहरात शिरले; नाशिकचे सावरकर नगर आणि पुण्यातील औंध ही त्यांची खास आवडती ठिकाणे ठरली.

पण खरी वीरता कुणी दाखवली? छत्रपती संभाजी नगरात चेतक घोड्याने महाराणा प्रतापासाठी प्राणांचे बलिदान दिले म्हणून त्याचे स्मारक झाले. रायगडावर शिवरायांच्या चितेवर उडी घेणाऱ्या निष्ठावान वाघ्या कुत्र्याचे स्मारक झाले. त्यामानाने वाघ-सिंहांची कर्तबगारी म्हणजे फक्त गर्जना आणि शिकार इतकीच!

जंगलात आग लागली तेव्हा चिमणीने चोचीत पाण्याचे थेंब आणून ती विझवण्याचा प्रयत्न केला. त्या वेळीही वाघ-सिंह सावलीत बसून गंमत पाहत होते. शेवटच्या टप्प्यात त्यांनी थोडेफार व्यवस्थापनाचे काम केले, एवढेच. अलीकडेच हिरवी पाने आणि लाल फुले मोजून काकराजची निवड झाली; हिरवी पाने जास्त असल्याने लोकशाही मार्गाने काकराज ‘जंगलचा राजा’ ठरला. त्या वेळीही वाघ-सिंह हतबल झाले.

माणसांनी मात्र त्यांच्या संख्येवर पर्यावरण संतुलन अवलंबून आहे असे सांगून परदेशातून वाघ-चिते आणले,  आजोबा’सारखे सिनेमे बनवले,  मोठमोठी भाषणे केली, पर्यटनास चालना मिळावी म्हणून प्रकल्प आखले. शहरांमध्ये वाघ-सिंहांचे भव्य स्मारक उभारले गेले, पण ते त्यांच्या कर्तबगारीसाठी नव्हे, तर माणसांच्या कल्पकतेच्या आणि कलात्मकतेच्या प्रदर्शनासाठी…!

Dr. Mahendra Ingale @  Pune on July 12, 2026
Author of 
Value‑Based Leadership

#EngineeringHeartBeats #ValueBasedLeadership #EngineeringDreamsInspiringSouls #अभियांत्रिकीस्पंदने #लोकशाहीचानवाराजाकाकराज

Friday, July 3, 2026

सॅल्युटच्या पलीकडे !

भाग २
सॅल्युटच्या पलीकडे !
 
सेक्युर्टी गार्ड सॅल्युट करीत होते...
पण तरी ही पाटील साहेब अस्वस्थ होते...
 
संध्याकाळी बाळासाहेब कुंजिर क्रीडा मैदानावरील ट्रॅक वर चालत असतांना सहजच त्यांच्या मनात विचार आला...
 
शासकीय सेवेची ३५ वर्षे कशी धबडग्यात गेली ते कळलेच नाही. आता निवांतपणा लाभला आहे तर ही अस्वस्थता का? हळू हळू संपूर्ण आयुष्याचा पटच त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहीला. ग्राउंड वरिल हाय-मास्ट दिव्यांच्या प्रकाशात तो आणखीनच स्पष्टपणे दिसू लागला...
 
महाविद्यालयीन काळात आणि त्यानंतर MPSC UPSC परीक्षेची तयारी करताना त्यांनी विपुल वाचन केले. मात्र पुढे शासकीय सेवेत प्रवेश झाल्यावर त्यांचा वेळ शासन निर्णय, प्रकल्प अहवाल, बजेटची व्हाईट-बुक्स, ब्ल्यू-बुक्स आणि वृत्तपत्रांच्या वाचनातच खर्च होऊ लागला. सखोल वाचन करून त्यावर चिंतन करण्यासाठी त्यांना फारसा वेळ देता आला नाही. ते व्यवस्थेचा भाग बनून त्यात इतके समरस झाले की स्वतःविषयी विचार करण्याची संधीच त्यांना मिळाली नाही.
 
ते शासकीय अधिकारी म्हणून नियुक्त झाले तेव्हा गावाकडे त्यांचा मोठा सत्कार झाला होता. कृतज्ञता भावाने त्यांनी स्वीकारला होता. आपल्याला मिळालेल्या पदाचा आपल्या लोकांच्या कल्याणाकरिता उपयोग करू असे भाव त्यांच्या मनात निर्माण झाले होते.
 
पुढे ते मंत्रालयात गेले. उपमुख्यमंत्र्‍यांचे सचिव म्हणून कार्यरत असतांना, मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर, त्यांना सामाजिक आणि राजकीय विण अधिक चांगल्या पद्धतीने समजली. त्यांच्या लाघवी स्वभावाने आणि मधुर बोलण्याने ते सर्वाना हवे हवेसे वाटायला लागले. मंत्रालयाच्या लॉबीतून चालतांना, मंद हसून ते सर्वांकडून अभिवादन स्वीकारायचे. यातील बरेच जण केवळ पदामुळे अभिवादन करीत आहेत हे त्यांना ठाऊक होते, तरीही ते त्यांना हवे हवेसे वाटू लागले होते.
 
वीस वर्षाहून अधिक काळ ते मंत्रालयात मंत्री आस्थापनेवर कार्यरत होते. 'यशोधन' मधील प्रतिष्ठेचे  शासकीय निवासस्थान, तेथून दृष्टीस पडणारे अरबी समुद्रक्वीन्स नेकलेस, नरीमन पॉइंट, क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (CCI) मधील उच्चभ्रूंचा वावर, ओबेरॉय टावर, ताज इंटरनॅशनल येथे देश-विदेशातील उद्योगपतींसोबत होणाऱ्या पंचतारांकित बैठका....या सर्वांबरोबरच पाटील साहेबांना लॉबीत मिळणारे अभिवादन आवडायला लागले होते.

ते निवृत्त झाले. सेवापूर्ती निमित्त मोठा सत्कार झाला. गौरवपर भाषणे झाली. मंत्री महोदय, वरिष्ठ अधिकारी, कुटुंबीय, सहकारी कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते. पाटील साहेब आनंदी होते. त्यांना कृतकृत्य झाल्या सारखे वाटत होते...

तरीही ही अस्वस्थता का? विचाराच्या तंद्रीत बराच कालावधी उलटून गेला....
 
पाटील साहेब घरी आले. दुपारचे जेवण झाल्यानंतर नेहमीप्रमाणे त्यांनी ईमेल चेक केले. फेस बूक कडून आलेले नोटिफिकेशन बघितले. एक पोस्ट त्यांच्या दृष्टीस पडली. ते थांबले. थोडे विचार मग्न झाले. नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे ते परीक्षण होते. खाली हॅश टॅग असल्याने त्यांनी त्या विषयाशी संबंधीत आणखी पोस्ट वाचल्या. पुस्तका विषयीची त्रिव्र उत्सुकता त्यांच्या मनात निर्माण झाली.  अमॅझान लिंकचा उपयोग करून त्यांनी पुस्तक मागवले. तिसऱ्या दिवासी पुस्तक प्राप्त झाले. त्यांनी ते झपाटल्या सारखे वाचून काढले. यात काही तरी आहे हे जाणवत होते पण नेमके काय ते समजत नव्हते. 

दुसऱ्या दिवशी त्यांनी पुस्तक पुन्हा वाचायला घेतले. आपल्यात बदल घडत आहे याची त्यांना जाणीव व्ह्यायला लागली. त्यांनी मनन केले. चिंतन केले. पुस्तक वाचून संपले तेव्हा संध्याकाळ झाली होती. त्यांनी संध्याकाळाचा चहा घेतला. ते घराबाहेर पडले. त्यांनी सेक्युरिटी गार्डसना यापुढे सॅल्युट न करण्याचे सांगितले.  
 
....आता पाटील साहेब अनेकांना स्वतःहून हात जोडून नमस्कार करतात. ज्यांचा सन्मान होतोय त्यांच्या जवळ जाऊन ते आस्थेने विचारपूस करतात. आपल्या लईत वॉकिंग करतात. सॅल्युटची अपेक्षा ठेवत नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर तेज आणि चालण्यात वेगळाच आत्मविश्वास जाणवतो. त्यांच्या व्यक्तिमत्वास झळाळी प्राप्त झाली आहे.
 
त्यांच्यातील हे बदल बघून पत्नी आश्चर्य चकित झाल्या. त्यांनी विचारले, "हे कसे घडले ?" त्यांनी शांतपणे पुस्तक दाखविले. बाईसाहेबांनीही  पुस्तक वाचायला सुरवात केली. आता त्यांचे सामाजिक कार्य अधिक अर्थपूर्ण होत आहे असे त्यांना वाटायला लागले आहे.
 
पाटील साहेब आणि त्यांच्या पत्नी, बाळासाहेब कुंजिर क्रीडा मैदानावरिल ट्रॅक वर नियमित फिरतांना दिसतात. पाटील साहेब एका NGO चे प्रमुख आहेत. गरीब, वंचित विद्यार्थ्यांना शैलक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य ही संस्था करते. एका अभ्यास मंडळाची स्थापनाही त्यांनी केली आहे. तेथे स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्व विकास, करियर गाईडन्स या संबंधीचे मार्गदर्शन मिळते. येथे सल्युट नाही पण सन्मान आहे, मनःपूर्वक !

शासनाच्या विविध समित्यांमध्ये ते आवश्यकतेनुसार सहभाग नोंदवतात. तीन Multinational कंपन्यांनी त्यांना Non Executive Director म्हणून बोर्डवर घेतले आहे. महत्वाच्या विषयांवर, ते बोलतात, लिहतात, त्या अनुषंगाने देश आणि विदेशात प्रवास करतात. नुकतेच त्यांना Bharat-USA Legislator's Engagement for Action and Policy (LEAP) उपक्रमांतर्गत ‘भारतातील राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्था’ या विषयावर व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या व्याख्यानाला उत्तम प्रतिसाद मिळाला.
 
आता सॅल्युट थांबला, पण संस्कार आणि मूल्यांची वृद्धी होत आहे. सन्मानाची अपेक्षा राहिली नाही; ते त्या पलीकडे गेले आहेत.
 
मनात विचार आला. पुस्तक वाचून बदल घडू शकतो का ? व्यक्ती स्वतः ठरविते तेव्हाच  तिच्यात बदल घडतो. पुस्तक हे निमित्त, पण त्या अनुषंगाने मनन, चिंतन घडते. काही वेळेस लख्खन वीज चमकावी असा विचार मनात येतो आणि नंतर आयुष्यच बदलून जाते, असेही घडते. जे मुळात आत आहे ते बाहेर येते, प्रगट होते, Manifest होते. 
 
आणखी एक विचार मनात आला. पाटील साहेबांनी मागविलेले पुस्तक 'Value Based Leadership' तर नसेल ना ?
 
Dr. Mahendra Ingale @  Pune on July 4, 2026
Author of Value‑Based Leadership

#EngineeringHeartBeats #EngineeringDreamsInspiringSouls #ValueBasedLeadership #अभियांत्रिकीस्पंदने
 

Sunday, June 28, 2026

पेंशनचा सॅल्यूट !

 पेंशनचा सॅल्यूट !

३५ वर्षीच्या प्रदीर्घ सेवे नंतर पाटील साहेब निवृत्त झाले. सेवपूर्तीचा मोठा कार्यक्रम झाला. कार्यक्रम आटोपून साहेब रात्री उशिरा घरी पोहचले. दिवसभर हर तुरे स्वीकारून, संभाषण आणि भाषण करून त्यांना थकवा आला होता. त्यामुळे बिछ्यान्यावर पडताच, त्यांना गाढ झोप लागली.

दुसऱ्या दिवशी सकाळी ते नेहमीप्रमाणे लवकर उठले आणि फिरायला निघाले. कुणाल आयकॉन रोडवरून चालत शिवार चौकात पोहोचल्यावर ट्रॅफिक हवालदार त्यांच्याकडे पाहून फक्त हसले—कडक सॅल्यूट मात्र केला नाही. पुढेही असेच अनुभव त्यांना येऊ लागले.

शिपायचा सॅल्यूट ही असे कधी घडले नव्हते .आता आपल्याला कोणीच सॅल्यूट करणार नाही का ?, हा विचार मनात येताच त्यांना दरदरून घाम आला. रात्रभर ते या कुशीवरून त्या कुशीवर होत होते. पहाटे पहाटे डोळा लागला. ते उशिरा उठले. फिरायला गेले नाहीत. घरातच येरझाऱ्या घालत राहिले. फिटबिटवर पावले मोजत राहिले.

साहेब स्वतःची समजूत घालू लागले... आपले सर्व ठीक काय... चांगलेच आहे. मुला मुलींची लग्ने झालेली आहेत. स्थावर आणि जंगम बऱ्यापैकी आहे. गावाकडे शेती घेतलेली आहे. पुण्यात दोन फ्लॅट्स आहेत. शेअर्स आणि म्यूचुअल फंडांमधे  कोटींवधीची गुंतवणूक आहे. तेव्हाडयाच रकमांच्या बँकांमध्ये एफ डी आहेत. सोने नाणे आहे. तरीही अस्वस्थता जात नव्हती. दिवसभर ती सोबत होती.

रात्री पुन्हा तीच अवस्था. पत्नीने विचारले, तुम्ही एवढे अस्वस्थ का? साहेब द्विधा मनस्थितीत होते—खरी परिस्थिती सांगावी की नको? शेवटी त्यांनी धाडस केले. मात्र बोलताना त्यांना जाणवले की आपल्या धाडसाचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यांनी सर्व हकिगत पत्नीला सांगितली.

पत्नी हसून म्हणाल्या, त्यात एवढे काय!

साहेब थोड्या नाराजीनेच म्हणाले, “तुम्हाला  त्याची कल्पना येणार नाही.

त्यांच्या सुविद्य पत्नी महिला मंडळाच्या अध्यक्षा होत्या, समाजकार्य करणाऱ्या. चुटकीसरशी प्रश्न सोडविण्याची त्यांची ख्याती होती. त्या म्हणाल्या, आता शांत झोपा. सकाळी मी तुमच्या सोबत येते. पूर्वीपेक्षा अधिक सॅल्यूट तुम्हाला मिळतील. हे ऐकताच साहेबांना गाढ झोप लागली. 

सकाळी ते नेहमीपेक्षा लवकर उठले. शेविंग करून, हलका स्प्रे मारून, जिन्स-पॅन्ट, शर्ट, जॅकेट आणि स्पोर्ट्स शूज घालून ते तयार झाले. पत्नीची वाट पाहू लागले.

दोघेही घराबाहेर पडले. लक्षदिप पॅलेसच्या सिक्युरिटी गेटवर पोहोचल्यावर पत्नीने सुरक्षा रक्षकाला बोलावून हळू आवाजात काही सांगितले. ते ऐकताच त्याने साहेबांना कडक सॅल्यूट मारला. साहेब मंद हसले, छाती अभिमानाने फुलली.

पुढे शिव टेरेस, साई पर्ल, अल्कोह, रोसलँड, कुणाल आयकॉन, रोझ आयकॉन अशा प्रत्येक सोसायटीजवळ पत्नी थांबायच्या आणि सिक्युरिटी पर्सन साहेबांना सॅल्यूट करायचा. संपूर्ण परिक्रमा अशाच सन्मानाने पूर्ण झाली.

साहेबांनी पत्नीचे आभार मानले. पत्नीचे महिला मंडळ आणि समाजकार्य अधिक जोमाने सुरू झाले आहे. पाटील साहेबांना एखाद्या समाजसेवी संस्थेकडून पुरस्कार देता येईल का, त्यांना एखाद्या मोठ्या पदावर पूनर्नियुक्ती मिळू शकेल का- या प्रयत्नात त्या सध्या आहेत.

वॉकमनवर सुमधुर संगीत ऐकत, सिक्युरिटी गार्डांचे सॅल्यूट घेत, पाटील साहेब रोज सकाळी नियमित वॉकिंग करतात, संध्याकाळी जिममध्ये जातात. दिवसभर उत्साहात असतात.

पाटील साहेबांच्या पेंशनचा बराचसा भाग आता सिक्युरिटी गार्डांवर खर्च होतो. या मूल्याच्या बदल्यात त्यांना मिळणारा ‘पेंशनचा सॅल्यूट’ त्यांच्यासाठी अमूल्य ठरतो आहे !

सहजच मनात विचार आला: आपण किती प्रमाणात पाटील साहेब आहोत.

Dr. Mahendra Ingale @  Pune on June 28, 2026
Author of 
Value‑Based Leadership

#ValueBasedLeadership #EngineeringHeartBeats #EngineeringDreamsInspiringSouls #अभियांत्रिकीस्पंदने

स्नेहसरींचे अविस्मरणीय क्षण !

 स्नेहसरींचे अविस्मरणीय क्षण !

महाराष्ट्र राज्य कृतिशील निवृत्त अधिकारी‑कर्मचारी संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा सदाशिव पेठेतील उद्यान कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभेचे अध्यक्षस्थान मा. श्री. चंद्रकांत दळवी यांनी भूषविले, तर प्रमुख उपस्थितीत श्री. शेखर गायकवाड, श्री. उमाकांत दांगट आणि श्री. व्यंकटेश गायकवाड होते.

सभेत निवृत्त अधिकारी‑कर्मचारी यांच्या हिताचे अनेक महत्त्वाचे विषय चर्चिले गेले. महाराष्ट्र शासनाने निवृत्तांच्या समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र विभाग निर्माण करावा, महागाई निर्देशांक लक्षात घेऊन आठव्या वेतन आयोगात निवृत्तांसाठी तरतूद व्हावी, तसेच संघटनेच्या वाढीत सदस्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा—अशा ठरावांवर सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. यामुळे निवृत्तीवेतन वेळेवर मिळेल, महागाई निर्देशांकानुसार त्यात वाढ होईल आणि उद्भवणाऱ्या समस्यांचे तातडीने निराकरण करता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

सभेतील विशेष आकर्षण ठरले ते यशदाचे अतिरिक्त महासंचालक श्री. शेखर गायकवाड यांचे रंजक भाषण. शासकीय अधिकारी म्हणून आलेले अनुभव त्यांनी नर्म विनोदी शैलीत मांडले आणि उपस्थितांना आनंदित केले.

इंजि. मनोहर पोकळे, श्री. रवींद्र धोंगडे, श्री. प्रवीण शेटे, श्री. नामदेव मोहिते आणि इंजि. साहेबराव पाटील यांच्यासह अनेक सहकारी व स्नेहीजनांची आनंददायी भेट घडली. या सहवासाने सभेचे वातावरण अधिक स्नेहपूर्ण झाले.

सहकाऱ्यांच्या भेटीचा आनंद आणि पावसाच्या सरींचा स्पर्श यामुळे वातावरण हर्षोल्हासाने भरून गेले, ते क्षण अविस्मरणीय बनवून गेले!

Dr. Mahendra Ingale @  Pune on June 28, 2026
Author of
Value‑Based Leadership

#ValueBasedLeadership #EngineeringHeartBeats #EngineeringDreamsInspiringSouls #अभियांत्रिकीस्पंदने


Tuesday, June 23, 2026

शांततेतील संवाद !

शांततेतील संवाद !

पाऊस पडून गेल्याने वातावरणात गारव्याची हलकी झुळूक पसरली आहे. मध्यरात्र उलटून गेली आहे. बरीचशी शांतता आहे.

थोडी रपेट मारावी म्हणून काव्यरत्नावली चौकापासून चालायला सुरुवात केली. हा चौक नेहमीच काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो—महत्वाच्या दिनविशेषांचे फलक येथे लावले जातात. आज महेश नवमीच्या शुभेच्छा देणारे झगमगते फलक नजरेस पडले.

कॉनक्रीटच्या प्रशस्त रस्त्यावरून पुढे जाताना दिवसभराच्या गजबजाटात दुर्लक्षित राहणाऱ्या अनेक गोष्टी डोळ्यांसमोर आल्या. त्या जणू संवाद साधण्याचा प्रयत्न करीत होत्या. अधिकाऱ्यांचे प्रशस्त बंगले, आकाशवाणी चौक, जिल्हाधिकारी कार्यालय व त्यासमोरील  बांधकाम भवन,  स्वातंत्र्य चौक व तेथील स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा, बस स्थानक, पोलिस मुख्यालय, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडासंकुल, जी. एस. ग्राउंड, छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी अश्वारूढ पुतळा, सिविल कोर्ट,  पंडित जवाहरलाल नेहरूंचा पुतळा आणि तेथून दिसणारे जळगाव रेल्वे स्टेशन. साधारण दोन अडीच किलोमीटरचे हे अंतर.

परतांना, नेहरूंच्या पुतळ्याजवळ थोडा थबकलो. १९६५ मध्ये जळगाव नगरपालिकेने हा सुंदर संगमरवरी पुतळा उभारला—जळगावच्या वैभवात भर घालणारा!

परवा विवेक सावंतांचे नेहरूंवरील भाषण ऐकले होते. MKCL चे कार्यकारी अधिकारी राहिलेले सावंत यांचे अभ्यासपूर्ण पण सहज संवाद वाटावा असे ते भाषण. त्याची आठवण तिथे उभी राहिली.

आणि मग आठवणींची साखळी सुरू झाली—जळगाव पॉलिटेक्निकमध्ये शिकत असताना, हॉस्टेलच्या मित्रांसोबत परीक्षा काळात मध्यरात्रीनंतर सायकलवरून रेल्वे स्टेशनजवळील ‘ब्रिजविलास’ रेस्टॉरंट मध्ये चहासाठी जाण्याची. तसेच मुंबईत ग्रँट रोडवरील ‘दिल्ली दरबार’ हॉटेलपासून अंधेरीतील SPCE हॉस्टेलपर्यंतच्या मध्यरात्रीनंतर सुरू केलेल्या ‘लाँग वॉक’ ची!

त्या आठवणींनी रात्रीच्या शांततेत आणखीनच गारवा निर्माण केला!

Dr. Mahendra Ingale @  Jalgaon on June 24, 2026
Author of 
Value‑Based Leadership

 #ValueBasedLeadership #EngineeringHeartBeats #EngineeringDreamsInspiringSouls #अभियांत्रिकीस्पंदने

 

वारी : श्रद्धा, समर्पण आणि मानवतेचा उत्सव !

       वारी : श्रद्धा , समर्पण आणि मानवतेचा उत्सव ! वारी म्हणजे पांडुरंगाचे , परमेश्वराचे साकार-निराकार स्वरूप! वारी म्हणजे भक्तिभाव आण...