Thursday, October 31, 2024

DEMOCRACY WINS !

 


*हंस, कावळे व मानसरोवर!*

लोक व्यवहारापासून अलिप्त असलेले, गुढ व्यक्तिमत्त्वाचे, प्रतिभावान व प्रथितयश लेखक जी. ए. कुलकर्णी यांची *विदूषक* ही अंतर्मुख करणारी प्रदीर्घकथा!

मी ती अनेकदा वाचली. आता ऐकतो.  व्यस्ततेमुळे मूळ कथा वाचणे किंवा ऐकणे आपल्याला सहज शक्य होणार नाही; म्हणून या कथेतील हंस, कावळे आणि मानस सरोवर या संबंधातील विडंबनात्मक रुपक-उपकथेचा काही भाग मी येथे उद्धृत करीत आहे. मूळ कथेतील प्रतिके वापरून, पुढे मी या उपकथेचा कल्पनाविस्तार केला आहे.

'*एकदा असंख्य कावळे मानससरोवराजवळ जमले. त्या ठिकाणी शुभ्र पंखांचा, लाल चोचीचा एक हंस हंसीबरोबर जलक्रीडा करत होता. कावळ्यांनी एकदम कलकलाट केला व त्यांनी हंसास मानससरोवर सोडून जाण्यास सांगितलं, कारण त्यांच्या आगमनाच्या क्षणापासून मानससरोवरावर त्यांची सत्ता सुरु झाली होती.

"अनादिकालापासून हे सरोवर हंसांसाठीच आहे." हंस म्हणाला, "शिवाय तुम्हाला पोहता येत नाही, तर मानससरोवर हवं कशाला?"

"आम्हाला पोहता येत नसेल, पण त्याचा आणि स्वामित्वाचा काय संबंध आहे? आपल्या सत्तेची नृत्यशाला अथवा गायनशाला असेल तर आपल्याला नृत्य-गायन आलंच पाहिजे असं कुठे आहे?" कावळ्यांच्या नेत्याने राजकारणी हसून विचारले. हा नेता मोठा व्युत्पन्न होता व त्याने कृष्णद्वीपात जाऊन न्याय व राज्यशास्त्राचा प्रगाढ अभ्यास केला होता.

"आणि आत्ताच्या आत्ता तू मानससरोवर सोडून गेला नाहीस, तर आम्ही सगळे तुझ्यावर तुटून पडू व तुझा आणि तुझ्या निवासस्थानाचा पूर्ण नाश करू!" एक तरूण कावळ्याने गर्जून सांगितले.

परंतु त्याच्या या कर्कश शब्दांनी नेत्यास क्रोध आला व त्याचे संस्कारित मन फार व्यथित झाले. त्याने आपल्या उतावीळ अनुयायांस गप्प बसवले. अशा त-हेच्या आततायी उपायांची योजना आता रानवट झाली होती आणि तिला कृष्णद्वीपनीतीत स्थान नव्हते. त्याने पुन्हा सौजन्यपूर्वक हसून म्हटले, "आपलं म्हणणं मला पूर्ण मान्य आहे. मानससरोवर हंसांसाठीच आहे, ही आपली प्राचीन परंपरा मला अढळ राखायची आहे. उलट, त्या पवित्र परंपरेच्याच सामर्थ्यशाली आश्रयाने मला मातृदेशाची कीर्ती वृद्धिंगत करायची आहे. पण त्यासाठी हंस कोण हे आधी ठरलं पाहिजे. आपण हंस आहात हे कशावरून?"

हंसाला या प्रश्नाचा मोठा विस्मय वाटला. त्याने आपल्या शुभ्र पंखांकडे पहिले. त्याला जलातील प्रतिबिंबात आपली डौलदार मान, तिच्या अग्रभागी असलेली कमलदलासारखी लाल चोच दिसली. पण आपण हंसच आहोत हे सांगण्यास त्यास प्रमाण सुचेना. कावळ्यांचा नेता नम्रपणे हसला. तो म्हणाला, "तेंव्हा प्रथम आपण या प्रश्नाचा निर्णय लावू. येथे उपस्थित असलेल्या सर्वांना आपण एकेक पान आणायला सांगू. जर आपण हंस असाल तर त्यांनी लाल पान आणावं. जर त्यांना मी हंस आहे असा विश्वास असेल तर त्यांनी हिरवं पान आणावं."

" पण या ठिकाणी हंसापेक्षा कावळेच संखेने जास्त आहेत." हंसी म्हणाली.

"देवी, आपले शब्द पूर्ण सत्य आहेत, पण तो आमचा का अपराध आहे?" नेता विनयाने म्हणाला.

थोड्याच वेळात त्या ठिकाणी हिरव्या पानांचा ढीग जमला. हंसीने जाऊन कमळाची एक लाल रंगाची अस्फुट कळी आणून ठेवली.

कावळ्यांचा नेता म्हणाला, "पाहिलंत? न्यायनीतीनुसार निर्णय घेऊन मी हंस ठरलो आहे, हे इतर सारे माझेच आप्तगण असल्यामुळे अर्थात ते देखील हंसच आहेत; आणि आता आपणच मान्य केलंत की, मानससरोवर हंसांसाठीच आहे. तेंव्हा तुम्ही आता येथून जावं हे न्यायाचं होईल."

हंस खिन्न होऊन सरोवराबाहेर आला. हंसीने त्याचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला, "प्रिया, तू खिन्न का?" ती म्हणाली, "पानांच्या राशीनं का हंसत्व ठरत असतं? चल, आपण येथून जाऊ. तू ज्या जलाशयात उतरशील ते मानससरोवर होईल! जेथे तू दिसशील ते तीर्थक्षेत्र ठरेल!* "'

सरोवरात, हंसाच्या वळचणीने राहणारी बदके,  समोरच्या झाडावरील वानर,  झाडाच्या ढोलीत राहणारी खार हे हंस व कावळ्यांच्या नेत्यातील संवाद उत्कंठतेने ऐकत होते; तसेच आणलेली लाल व हिरवी पाने मोजून हंस कोण हे ठरवण्याची नाविन्यपूर्ण प्रक्रिया जवळून बघत होते. कावळ्याच्या नेत्याचे  सामर्थ्य, बुद्धीवैभव, वाक्चातुर्य, तर्कसंगत पद्धतीने त्याने केलेले विवेचन, त्याचा शांत व संयमी स्वभाव बघून ते फार प्रभावित झाले. आपणांस अनुयायी म्हणून स्वीकारावे अशी त्यांनी नेत्याकडे आजिजीने विनंती केली; ती त्याने मान्य केली. त्यानंतर घारी आणि  गिधाडांनीही कावळ्यांच्या नेत्याचे नेतृत्व स्वीकारले.

कावळ्यांच्या नेत्याने मानसरोवर बगळ्यांकडे, तर समोरचा भूप्रदेश वानराकडे सोपविला. खारीला आवश्यक त्या सुखसोयी ढोलीतच पुरवण्यात येत असून; सभोवतालच्या प्रदेशाच्या टेहळणीची  जबाबदारी तिच्यावर सोपविण्यात आलेली आहे.

आकाशात उंच भरारी घेणारा व आपल्या तीक्ष्ण नजरेने भक्ष्याचा वेध घेऊन, वेगाने झडप घालणारा सुवर्ण गरुड परिस्थितीचे अवलोकन करीत होता. उद्या हेच कावळे पानांचे भारे गोळा करत माझ्या कांचनगौरी शिखरावर अधिकार सांगू लागतील हा विचार त्याच्या मनात येताच त्याच्या अंगावरील पिसे उसळली व डोळ्यात अंगार फुलला... 

*प्रा. महेंद्र इंगळे, जळगांव -पुणे*

(ता.क. कथेत लेखकाला अभिप्रेत असलेले हे कृष्णद्वीप म्हणजे जागतिक दर्जाचे Harward  सारखे एखादे विद्यापीठ तर नाही ना? नेत्याने तेथून MBA, Doctorate of Law, Juris Doctor या सारख्या पदव्या प्राप्त केल्या होत्या काय?  असे प्रश्न मला पडतात.)

Saturday, October 5, 2024

FAREWELL TO STUDENTS

 


*शासकीय तंत्रनिकेतन जळगांव येथील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभातील मनोगत....*

माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, 

आज निरोपाचा दिवस. तीन वर्षापूर्वी तुम्ही या संस्थेत आला होतात. तुम्ही जेव्हा पहिल्या दिवशी या संस्थेत प्रवेश केला तेव्हा गेटवरील सिक्युरिटी, चाळीस एकरांचा वनराईने नटलेला संस्थेचा विस्तीर्ण परिसर, संस्थेची मुख्य दगडी इमारत, विविध विभागांच्या इमारती, मुलांची आणि मुलींची वसतीगृहे, कॅन्टीन, वर्कशॉप, तुमच्यासारख्याच प्रवेशा करिता आलेल्या मुलांची आणि त्यांच्या पालकांची झालेली गर्दी बघून तुम्ही कावरे बावरे झाल होतात. मुख्य इमारतीत प्रवेश केल्यानंतर तुम्ही ड्रॉइंग हॉलमध्ये आलात तेव्हा तुम्ही सुटकेचा नि:श्वास सोडला. प्रवेश समितीचे प्रमुख प्रा. के. पी. वानखेडे, प्रा. गडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मार्गदर्शन करून याच ड्रॉइंग हॉलमध्ये तुमची बसण्याची व्यवस्था केली त्यावेळेस तुम्ही थोडे निश्चिंत झालात. ज्या शिस्तबद्ध रीतीने प्रवेश प्रक्रिया पार पडत होती ते बघून तुम्ही थोडेसे आश्चर्यचकित झालात. या वेळी मी माझ्या केबिनमध्ये असलो तरीसुद्धा पूर्वानुभवाने मी या सर्व गोष्टी कल्पनेने अनुभवत होतो. 

प्रवेश प्रक्रिया संपली. तुम्हाला या संस्थेत प्रवेश मिळाला. कॉलेज सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी तुम्हा सर्वांचे आम्ही पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. विभाग प्रमुखांची मार्गदर्शनपर भाषणे झालीत. ती तुम्ही मनापासून ऐकलीत. पुढील काळात त्याचे अनुपालनही केले. या तीन वर्षाच्या कालावधीत तुम्ही भरपूर अभ्यास केला, विविध कार्यक्रमांत सहभाग घेतला, त्यांच्या आयोजनात हिरीरीने सहभाग घेतला, तुमच्यापैकी काहींना Dipex या राज्यस्तरीय Project Competition मधे, काहींना राज्यस्तरीय Paper Presentation, Technical Quiz Competition मधे प्रथम पारितोषिक मिळाले. त्यांचा आपण गुणगौरव केला. तुमच्या अडीअडचणी समजून घेण्याकरिता विद्यार्थी सभा व पालक मिळवावे घेतले. त्यामधून आलेल्या सूचनांची तुमच्या सहकार्याने अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला. विशेषतः हॉस्टेल मध्ये राहणाऱ्या मुला मुलींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांची सुरक्षाही अत्यंत महत्त्वाची असते. विभाग प्रमुख व रेक्टर असलेले डॉ. राजेश पाध्ये व त्यांच्या सहकाऱ्यांना तुम्ही सहकार्य केले. कधीही कुठला अनुचित प्रकार घडला नाही ही खरोखरच सर्वांकरिता कौतुकास्पद बाब आहे.

तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात की तुम्हाला शासकीय तंत्रनिकेतन जळगांव या नामांकित संस्थेत प्रवेश मिळाला. शासकीय तंत्रनिकेतन, जळगांव ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था आहे हे आपणा सर्वांना माहित आहेच. या संस्थेतील विद्यार्थी, प्राध्यापक व सर्व कर्मचारी हे एका कुटुंब प्रमाणे आहेत याचा आपण अनुभव घेतला आहे. आता आपण येथून बाहेर पडून एका नवीन जगात प्रवेश करणार आहात. त्यात तुम्हास कदाचित एवढी सुरक्षितता लाभणार नाही, परंतु येथे मिळालेल्या बाळकडूच्या आधारावर तेथेही यशस्वी होऊन नावलौकिक मिळविणार याबाबत माझ्या मनात शंका नाही. कारण यापूर्वी तुमच्या सारखेच अनेक विद्यार्थी या संस्थेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी देशात व परदेशात आपलं कर्तृत्व सिद्ध केलेले आहे. तुमच्या पैकी काही जणांनी आपल्या मनोगतातून संस्थेविषयी, येथील प्राध्यापक व कर्मचारी यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली ही खरोखरच समाधानाची बाब आहे. 

तुम्ही या संस्थेतून बाहेर पडल्यानंतर  एक यशस्वी अभियंता म्हणून बाहेर पडणार आहातच पण एक चारित्र्यसंपन्न माणूस व्हावा याकरिता यापुढेही सातत्याने जाणीवपूर्वक प्रयत्न करीत राहा. यशस्वी अभियंता बनणे सोपे आहे. चारित्र्यसंपन्न माणूस बनणे कठीण आहे. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करीत राहणे गरजेचे आहे. ती एक तपश्चर्या आहे.

स्वातंत्र्य, समता, बंधुता, प्रेम, कृतज्ञता यासारख्या शाश्वत मूल्यांचा विसर पडू देऊ नका. आई-वडिलांविषयी कृतज्ञता बाळगा. गुरुजनांविषयी कृतज्ञता बाळगा. ज्यांनी ज्यांनी तुम्हाला आयुष्यात मदत केली त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगा. ज्यांनी ज्यांनी आपल्या आई-वडिलांविषयी कृतज्ञता बाळगली, आपल्या गुरुजनांविषयी कृतज्ञता बाळगली ते सर्वजण मोठी माणसे झालीत.

तुम्ही ऐश्वर्या संपन्न व्हा. पद, पैसा आणि प्रतिष्ठा तुम्हाला मिळणार आहेच. कदाचित त्याला थोडा वेळ लागू शकतो. पण केवळ ते मिळवण्यासाठी मूल्यांचा बळी देऊन स्वप्रतिमा मलिन होईल अशा तडजोडी करू नका. मूल्याधिष्ठित जीवन जगा. त्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ समाधान मिळू शकते. सत्तास्थानी असतांना आयुष्यात अनेक मोहाचे क्षण येतील तेव्हा विवेक बुद्धीचा उपयोग करून त्यांना झिडकारा. नियमितपणे प्रार्थना करा. त्यामुळे अंतर्मनाच्या कौलानुसार  निर्भयपणे तुम्ही कठोर निर्णय घेऊ शकाल.

नाविन्याचा हव्यास धरा. प्रत्येक गोष्ट करतांना ती वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने करा. त्याचे एक वेगळे समाधान तुम्हाला मिळेल. संधी मिळेल तेव्हा तुम्ही केलेल्या चांगल्या कामाविषयी नम्रपणे इतरांना सांगा. कदाचित काहीजण त्यामुळे प्रोत्साहित होऊ शकतील. चांगुलपणा प्रसारित करा. संधी मिळेल तेव्हा यशस्वी माणसांना भेटण्याचा प्रयत्न करा. यशस्वी माणसांना दुसऱ्यांना मदत करायला आवडते. त्यामुळे आत्मविश्वासपूर्वक त्यांना भेटण्याचा प्रयत्न करा व त्यांचे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करा.चांगले मित्र जोडा. मैत्री जपा. आयुष्यात येणाऱ्या बऱ्या वाईट प्रसंगांत त्यांची साथ तुम्हाला मोलाची ठरेल.

अशा अभ्यासक्रमाव्यतिरिक्त पण महत्त्वाच्या असलेल्या काही गोष्टी सांगण्याची संधी मला या निमित्ताने मिळाली. त्याचा निश्चित तुम्हाला फायदा होईल अशी मला खात्री आहे. अभ्यासही तेवढाच महत्त्वाचा आहे. येणाऱ्या परीक्षेत तसेच पुढील आयुष्यात तुम्हाला भरभरून यश मिळो याकरिता मनःपूर्वक शुभेच्छा!

यशस्वी भव!! 

*प्राचार्य डॉ. महेंद्र इंगळे*

DAYS IN NITTR BHOPAL

 


*NITTR, Bhopal शी ऋणानुबंध...*

महाराष्ट्र शासनाच्या तंत्र शिक्षण विभागात World Bank  Assisted Project राबविला जात असतांना त्या प्रकल्पांतर्गत माझी  HRD Ministry अंतर्गत येत असलेल्या Technical Teachers' Training Institute,  Bhopal या नामांकित संस्थेत Barkatullah University संलग्न Master of Technical Education या पदव्युत्तर अभ्यासक्रमा करिता निवड झाली. याकरिता प्राचार्य एम.एस. महाजनसर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. माझ्यासोबत महाराष्ट्रातील प्रा. जी .एम. केचकर व प्रा. पी.पी. पवार हे आणखी दोघे सहकारी होते.

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या व मध्य प्रदेशची राजधानी असलेले भोपाळ एक सुंदर शहर. येथे पाच सुंदर जलाशये असल्यामुळे या शहराला 'सिटी ऑफ लेक्स' असेही म्हणतात. भोपाळ शहरातील सर्वात सुंदर अशा शामला हिल्स परिसरात आमची TTTI ही संस्था होती. शेजारीच मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांची निवासस्थाने होती. त्याला लागून नाट्य, संगीत, पारंपारिक कला,  संस्कृती यांच्या उन्नती करता स्थापन करण्यात आलेली केंद्र शासनाची भारत भवन ही संस्था. येथून खाली जाणाऱ्या रस्त्याच्या एका बाजूला वनविहार राष्ट्रीय उद्यान तर दुसऱ्या बाजूला बडा तालाब.

प्रा. आर. के. मणी हे संस्थेचे डायरेक्टर होते. त्यांच्या अनेक जवळचे मित्र राज्य व केंद्र शासनात सचिव पदावर कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्या वागण्या बोलण्यात एक आत्मविश्वास व मोकळेपणा जाणवायचा.‌ अनेक महत्त्वाचे प्रकल्प मिळवण्याच्या कामी त्यांचा संस्थेला फायदा झाला. कुठल्याही कार्यक्रमात त्यांची उपस्थिती चैतन्यदायी असायची. मॅनेजमेंट विभागाच्या प्रमुख प्रा. मंजूल सक्सेना, प्रा.आर.बी. शिवगुंडे व प्रा. बी.एल. गुप्ता हे मॅनेजमेंट विषय शिकवत असतांना त्यातील मॉडेल्स अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगत असत. व्यवहारात त्याचा प्रत्यक्षात कसा उपयोग होतो ते सोदाहरण स्पष्ट करून सांगायचे.

अमेरिकेत स्थायिक झालेले संस्थेचे माजी प्राध्यापक डॉ. चंद्रशेखर हे आम्हाला Leadership Development  हा विषय शिकवण्याकरिता अमेरिकेवरून आले होते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सतत तीन दिवस त्यांनी आम्हास हा विषय शिकवला. अक्षरशः कानात प्राण आणून आम्ही त्यांचे बोलणे ऐकत असू. आमच्यासोबत अनेक फॅकल्टी मेंबर्सनी त्यांचे सेशन्स अटेंड केले.

मराठी वाचनाची मला आवड होतीच पण इथे आल्यावर मला अनेक चांगली इंग्रजी पुस्तके वाचायला मिळाली. त्यामुळे इंग्रजी वाचनाची माझी आवड वाढली. येथील भव्य लायब्ररीत (Learning Resources Centre) मध्ये सर्व प्रकारच्या पुस्तकांबरोबरच विविध प्रकारचे Magazines, International Journals, Audio Video Cassettes उपलब्ध होते. Harvard Business Review मधील केस स्टडीजचा मला Assignment लिहितांना खूप उपयोग व्हायचा. नव्याने चर्चेत आलेले Peter Segne चे Learning Organisation Model मला इथे अभ्यासायला मिळाले. Peter Drucker ची मॅनेजमेंट या विषयावरील, Stephen Covey ची लीडरशिप या विषयावरील, Sigmand Fried, Thomas Anthony, Abrahm Maslow यांची मानसशास्त्र विषयावरील... अशी पुस्तके  मी अभ्यासा करिता वापरली.

Power of Positive Thinking, Tough Times Do Not Last But Tough People Do, An Autobiography of a Yogi ही बेस्ट सेलर असलेली पुस्तके वारंवार वाचत असतो.

भारत भवन मध्ये नवीन नाटक यायचे तेव्हा ते आम्ही आवर्जून बघायला जायचो. येथे आम्ही घाशीराम कोतवाल, चरणदास चोर, दो कवडी का खेल यासारखी अनेक हिंदी नाटके बघितली. नाटकाच्या तिकिटा सोबत नाटकाचं रसग्रहण केलेली व सुंदर फोटोग्राफ्स असलेली एक पुस्तिका प्रत्येकाला मिळायची त्यामुळे नाटकाविषयी व त्यातील कलाकारांविषयी सखोल माहिती मिळण्यास मदत व्हायची. बऱ्याचदा संध्याकाळी आम्ही भारत भवन वर फिरायला जायचो त्यावेळेस प्रसिद्ध नाटककार हबीब तन्वीर  कॅन्टीनमध्ये किंवा शिल्प, चित्र, हस्तकला यांच्या वर्कशॉप्स मध्ये हातात चिरूट घेऊन आरामात बसलेले किंवा गप्पागोष्टी करीत असलेले दिसायचे. बऱ्याचदा त्यांच्याशी जुजबी बोलणे व्हायचे.

मुलांना दिवाळीच्या व उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यावर आम्ही सहकुटुंब तिथे राहत असू. ट्रेनी हॉस्टेलमध्ये प्रत्येकाकरिता सिंगल रूम  व मेस व्यतिरिक्त कॉमन कीचन ची व्यवस्था होती.

भोपाळ येथील माझे १९९६ ते १९९८ या कालावधीतील वास्तव्य अतिशय आनंददायी  व संस्मरणीय ठरले. या कालावधीत माझ्या व्यक्तिमत्वात मोठा बदल घडून आला.

यापूर्वी १९८९ मध्ये व ९० मधे इंडक्शन ट्रेनिंग प्रोग्राम फेज-१ व‌ फेज-२  करिता TTTI (NITTR) येथे आलो होतो, परंतु तेव्हा बराच वेळ हा ओल्ड मार्केट आणि न्यू मार्केट मध्ये फिरण्यात जायचा. शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी पंचमढी,  भीम भेटका सांची स्तूप, वनविहार, बडा तालाब,  छोटा तालाब अशा जवळपासच्या ठिकाणी  फिरण्यात जायचा. प्रा. राजेश खंबायत जळगावचे असल्यामुळे आपण घरीच आहोत असे वाटायचे. तेही दिवस आनंदादायी होते. 

त्यानंतर बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रशिक्षण कार्यक्रमांत भोपाळ येथे आलो. २००८ मधे मी नॅशनल फेडरेशन ऑफ पॉलीटेक्निक टीचर्स असोसिएशनचा अध्यक्ष असतांना येथे दोन दिवसांची नॅशनल कॉन्फरन्स आयोजित करण्यात आलेली होती. अध्यक्षस्थानी राजीव गांधी टेक्नॉलॉजी  यूनिवर्सिटीचे कुलगुरू डॉ. पी. व्ही. शर्मा, सचिव श्री आशिष डोंगरे उपस्थित होते.

असा माझा NITTR शी ऋणानुबंध आहे.

*प्रा. डॉ. महेंद्र इंगळे*

Friday, October 4, 2024

ENGINEER AND GIRL FRIEND

ENGINEER AND GIRL FRIEND

ENGINEER - 1

तिच्याशी मैत्री झाली.

एक दिवस तो तिला म्हणाला, "तू खूप छान दिसतेस." 

ती म्हणाली, "ते तर मला माहितीये. मला जे माहित नाही ते सांग."

मग त्याने तिला Radiation पद्धतीने Heat Transfer कसे होते हे तिला Stefan Boltzmann Equation कागदावर लिहून समजावून सांगितले.

तेव्हा पासून तो सिंगलच आहे ...!

चाकणला काही दिवस शॉप फ्लोअरवर काम केल्यानंतर, तो आता कविता करतो; त्यातील एक कविता: 

ती चालली असता तिची वाट

म्हटलं, थांब!

मूठभर राख तिच्या हातात देऊन 

म्हटलं, माझ्या अंगास फास!

ऐकून शब्द माझे ती हळहळली

गाला वरती दोन टपोरी

आसवे ओघळली

आसवांचे शब्द झाले आणि

कविता ही साकारली!


ENGINEER - 2

तिच्याशी मैत्री झाली.

एक दिवस तो तिला म्हणाला, "तू खूप छान दिसतेस." 

ती म्हणाली, "ते तर मला माहितीये. मला जे माहित नाही ते सांग."

मग त्याने तिला समुद्रातील जहाजावरून आकाशात उंच उडणाऱ्या विमानाला, Projectile Equation चा उपयोग करून, Missiles च्या साह्याने कसे उद्ध्वस्त करायचे हे आपल्याजवळील लॅपटॉप वर Simulations द्वारे समजावून सांगितले तेव्हा, त्याच्या प्रेझेंटेशन ने ती प्रभावित झाली.

तिच्या गालावर पडणाऱ्या खळी विषयी, एक दिवस तो तिला म्हटला होता,

'गालावरची खळी तुझ्या ही 

तारुण्याचे स्वप्न मनोहर !

यौवन गहिऱ्या आभाळात, 

चंद्रबिंब कि पडले सुंदर !

गालावरची खळी तुझ्या ही 

मनास टाकी माझ्या मोहून!

न्याहाळता तित रूप आपुले 

प्रश्नच जाते उत्तर होऊन !'

ऐकून शब्द त्याचे ती मोहरली

गालावरती दोन टपोरे फुले उमलली

फुलांच्या पाकळ्या झाल्या 

त्या शब्द रूपाने मांडल्या.

लग्नानंतरची अनेक वर्षे, तो सांगत होता ते ती निमुटपणे ऐकत होती!

महेंद्र इंगळे

Sunday, September 29, 2024

Training Program for Bafana Jewellers

 


*बाफना ज्वेलर्स कर्मचाऱ्यांकरिता प्रशिक्षण कार्यक्रम...*

पूर्वी मी शासकीय तंत्रनिकेतन, जळगांव येथे प्रशिक्षण व आस्थापना अधिकारी, केंद्र शासनाच्या सामूहिक तंत्रनिकेतन प्रकल्पाचा प्रमुख तसेच ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, न्यू दिल्ली अंतर्गत असलेल्या आंत्रप्रिनरशिप मॅनेजमेंट अँड डेव्हलपमेंट सेंटरचा प्रमुख म्हणूनही मी कार्यरत होतो. त्या अंतर्गत विविध उद्योग समूहांकरिता, संस्थांकरिता, प्रशिक्षणार्थींकरिता उद्योजकता, व्यक्तिमत्व विकास, संभाषण कौशल्य, नेतृत्व गुण विकास अशा विविध विषयांशी संबंधित प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करित होतो. त्याकरिता आम्ही एक टीम तयार केलेली होती. मी स्वतः, प्रा. आर. एम. नाफडे, प्रा. एम. बी. सानप, प्रा. एस. एन. जुमडे, प्रा. जयंत नांदेडकर (दुर्दैवाने आज ते आपल्यात नाहीत) अशी आमची एक टीम होती‌.

या संबंधात नामांकित संस्थांमध्ये आमचे प्रशिक्षण झालेले होते. माणसांमधे निश्चित व स्थायी स्वरूपाचा बदल घडवून आणायचा असेल तर तो  केवळ प्रशिक्षणानेच घडवून आणता येतो. व्याख्यानाने, प्रवचनाने, कथा आणि कीर्तनाने माणसे बदलण्याची शक्यता फार कमी असते. संस्थांच्या गरजेनुसार आम्ही प्रशिक्षण कार्यक्रम डिझाईन करीत होतो.

मा. प्रतिभाताई पाटील यांच्या कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी बांभोरी, जळगांव या संस्थेकरिता ते एन बी ए ॲक्रेडिटेशन करिता जात असतांना तेथील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरिता प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.

नूतन मराठा संस्थेचे व्यवस्थापन प्रतिनिधी श्री. शिवाजीराव भोईटे यांच्या विनंतीनुसार संस्थेत कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील सर्व हायस्कूलच्या मुख्याध्यापकांकरिता प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महाराष्ट्रातील अभियांत्रिकी संस्थांच्या प्राध्यापकांकरिता 'इन्स्टिट्यूशनल मॅनेजमेंट' या विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

सुवर्णनगरी व आता स्वर्ण तीर्थ म्हणून ओळख असलेल्या जळगाव येथील रतनलाल सी. बाफना यांच्या 'बाफना ज्वेलर्स' या प्रसिद्ध  फर्मच्या कर्मचाऱ्यांकरिता आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाविषयी मी आज लिहीत आहे.

सोन्या-चांदीच्या व्यवसायातील स्पर्धेमुळे बाफना ज्वेलर्स या फर्म मधील कर्मचाऱ्यांचे नोकरी सोडून जाण्याचे प्रमाण वाढलेले होते.

आमच्या कर्मचाऱ्यांकरिता आपण प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावा व आमचा प्रश्न सोडवावा असा प्रस्ताव मा. रतनलालजी बाफना यांनी आमच्याकडे दिला. त्यानुसार आम्ही तीस कर्मचाऱ्यांकरिता एक ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित केला.

ठिकाण: नयनतारा गेस्ट हाऊस

वेळ: रोज सकाळी ६ ते ९.३०

प्रशिक्षणाचा पहिला दिवस: 

आम्ही सर्व प्रशिक्षक पावणेसहा वाजता माईक टेस्टिंग वगैरे करून एलसीडी प्रोजेक्टर ऑन करून पूर्णपणे तयारीत होतो. ठीक सहा वाजता प्रशिक्षण कार्यक्रम सुरू झाला. जसजसे प्रशिक्षणार्थी  हॉलमध्ये येत होते तसतसे आम्ही हसतमुखाने त्यांचे स्वागत करीत होतो. प्रशिक्षण वेळेवर सुरू होणार नाही हा बऱ्याच प्रशिक्षणार्थींचा अंदाज खोटा ठरला. सर्वात प्रथम आम्ही आमचा परिचय करून दिला. त्यानंतर प्रशिक्षणार्थींचा परिचय करून घेतला व पुढील कार्यक्रमास सुरुवात झाली. आठ वाजता  टी ब्रेक झाला. त्यामध्ये प्रा. सानप सर्व कर्मचाऱ्यांना प्रथम नावाने संबोधित करून भेटत होते. हे सर्व बघून कर्मचारी आश्चर्यचकित झाले. आमच्यापैकी दोघेजण सर्व कर्मचाऱ्यांचे ऑब्झर्वेशन करीत होते. कुठला कर्मचारी आक्रमक आहे, अनावश्यक प्रश्न विचारणार आहे, त्रुटी काढणार आहे याचा आम्हाला आधीच अंदाज येतो.

टी ब्रेक नंतर दुसरे सेशन संपन्न झाले. अर्थातच ते फार प्रभावी झाले.

दुसऱ्या दिवसापासून श्री. सुशील बाफना (पप्पू शेठ) प्रशिक्षण कार्यक्रमात पूर्ण वेळ उपस्थित राहत होते. तशी त्यांना आम्ही पूर्वीच सूचना केलेली होती.

दुसऱ्याच दिवसापासून सर्वजण अगदी उत्साहाने कार्यक्रमात सहभाग घेऊ लागले आणि त्यात पूर्णपणे समरस झाले. त्यांच्यात आणि आमच्यात एक अतुट नाते निर्माण झाले आहे याची त्यांना जाणीव व्हायला लागली.या प्रशिक्षण कार्यक्रमात कर्मचाऱ्यांमध्ये प्रामाणिकपणा व संस्थेविषयी बांधिलकी (Organizational Commitment) हे दोन गुण विकसित करावेत असे आम्ही ठरविले होते. त्याकरिता सेल्फ एक्स्प्लोरेशन टेक्निकचा आम्ही उपयोग केला. म्हणजे प्रशिक्षणार्थीने स्वतः व्यासपीठावर येऊन त्यास प्रामाणिकपणाबद्दल काय वाटते हे स्वतःच्या शब्दात सांगायचे. त्यानंतर त्यास आम्ही काही प्रश्न विचारतो. त्या प्रश्नांची उत्तर द्यायला प्रशिक्षणार्थीने सुरुवात केल्यावर प्रामाणिकपणा हा गुण त्याच्यामध्ये विकसित होण्याची प्रक्रिया सुरू होते.

संस्थेबद्दल बांधिलकी हा गुण निर्माण करायचा होता तेव्हा कर्मचाऱ्यास व्यासपीठावर बोलवून आम्ही त्याला संस्थेत काम करत असतांना तुमच्या आयुष्यातील सर्वात सुखाचे व दुःखाचे क्षण कोणते असा एक प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर देतांना काही कर्मचारी अक्षरशः रडत होते. या प्रश्नाचे उत्तर देत असतांना  प्रशिक्षणार्थीत संस्थेविषयी बांधिलकी निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू होते.

प्रशिक्षण कार्यक्रमात आम्ही प्रात्यक्षिकांसह वेगवेगळे सेशन्स कंडक्ट केलेत. प्रा. नाफडे यांनी Delighted Customer (आनंदी ग्राहक) ही संकल्पना स्पष्ट करून सांगितली. प्रा. नांदेडकर यांनी स्वप्रतिमा कशी विकसित करावी याविषयी मार्गदर्शन केले. प्रा. जुमडे यांनी एकमेकांशी व ग्राहकांशी सुसंवाद कसा असावा यासंबंधी महत्त्वाच्या टिप्स दिल्या. प्रा. सानप यांनी सुवर्ण व्यवसायातील सध्याच्या समस्या, प्रतिस्पर्धी ओळखून व्यवसाय वृद्धी कशी करावी,  कर्मचाऱ्यांचे योगदान त्यात कसे महत्त्वाचे आहे याविषयीचे अभ्यासपूर्ण विवेचन केले.

शेवटी, लहानपणी पायाने अधू असलेल्या कार्ल लुईस या धावपटूने आपल्या व्यंगावर मात करून शंभर मीटर धावण्याच्या ऑलिंपिक स्पर्धेत नऊ वेळा सुवर्णपदके पटकावली व आपली स्वतःचीच रेकॉर्डस् अनेकदा मोडलीत ही प्रेरणादायी गोष्ट मी नाट्यमयरीतीने सांगतली तेव्हा श्रोते रोमांचित झालेत... टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला... 

हा अनुभव पुन्हा एकदा मी घेतला...

*प्रा. डॉ. महेंद्र इंगळे*

ओसाड माळरानावर नंदनवन फुलले

 


परवा शिशिर जैन भेटला. शिशिर श्रमसाधना ट्रस्ट द्वारा संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअर अँड टेक्नॉलॉजी, जळगांव या संस्थेचा १९८३ च्या पहिल्या बॅचचा माझा विद्यार्थी. आता मानस कन्स्ट्रक्शन या नावाने जळगांवात बांधकाम व्यवसायात आहे. सर, तुम्ही ॲप्लाईड मेकॅनिक्स तर उत्कृष्टरित्या शिकवित होताच; पण तुमच्या शिस्त आणि वर्तणूकी बद्दलच्या आग्रहाचा आम्हाला खूप फायदा झाला असे त्याने सांगितले. 

........पुणे विद्यापीठाचे गोल्ड मेडलिस्ट असलेले माझे मित्र प्रा. एल. पी. पाटील व मी वेगवेगळ्या डिव्हिजन्सला ॲप्लाइड  मेकॅनिक्स हा विषय अत्यंत आवडीने शिकवायचो. त्याकरिता प्रचंड मेहनत घ्यायचो. Beer and Johnston यांनी लिहिलेली व जगभरात वापरली जाणारी  मॅक्ग्रा हिल पब्लिकेशनची Engineering Mechanics ची Statics आणि Dynamics ही दोन पुस्तके आम्ही वापरायचो. अत्यंत नेटकेपणाने आणि काळजीपूर्वक छापलेल्या या पुस्तकांत कोणतीही प्रिंटिंग मिस्टेक नाही तसेच सर्व अनसॉल्व्हड प्रॉब्लेम्सची शेवटी दिलेली उत्तरे तंतोतंत बरोबर आहेत. या पुस्तकांतील जवळजवळ सर्व प्रॉब्लेम्स आम्ही सोडविले होते. डायनामिक्स या भागातील काही प्रॉब्लेम्स आम्हाला सोडविता येत नव्हते तेव्हा पुणे येथे जाऊन प्रा. बर्वे यांचे मार्गदर्शन घेतले होते.

पंचवीस वर्षानंतर माझी मुलगी पौर्णिमा हिने Vishwakarma Institute of Technology, Pune या संस्थेत शिकत असतांना माझ्याकडे असलेले हेच पुस्तक वापरले. या विषयात ती प्राविण्यासह उत्तीर्ण झाल्यानंतर तिचे शिक्षक प्रा. तारापोरवाला यांनी तिला बोलवून तुला कोणाचे मार्गदर्शन लाभले याची विचारणा केली होती. आजही ही पुस्तके माझ्याकडे आहेत. 

पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात अतिशय कठीण असलेला अप्लाईड मेकॅनिक्स हा विषय शिकवितांना मला व्यक्तिशः त्याचा खूप फायदा झाला. माझ्यातील अभ्यासू वृत्ती वृद्धिंगत झाली. या विषयाने मला ऐश्वर्य संपन्न केले. विद्यार्थ्यांमध्ये व सहकाऱ्यांमधे माझ्याविषयी आदर निर्माण केला. 

........ अप्लाईड मेकॅनिक्स या विषयाचे सत्र कर्म (Term Work) वेळेत पूर्ण न केल्यामुळे, प्राचार्य एम.जी. पाटील यांचा त्यास विरोध असतांनाही, मी चतुर्वेदी नावाच्या एका विद्यार्थ्याला डिटेंड (परीक्षेला बसण्याची परवानगी नसणे) केले. चतुर्वेदी हा दिल्ली येथील केंद्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याचा मुलगा होता. जळगांव येथील एक उद्योजक त्याचे स्थानीय पालक होते.

सदर प्रकरणाची मा. प्रतिभाताई पाटील यांनी फोन करून माहिती घेतली. चतुर्वेदी हा बेशिस्त विद्यार्थी आहे, त्याला वारंवार संधी देऊनही त्याने सत्र कर्म पूर्ण केले नाही. संस्थेच्या दीर्घकालीन हिताचा विचार करता व शिस्त टिकून राहावी याकरिता त्याच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे असे मी त्यांना सांगितले. त्यावर ठीक आहे, योग्य तो निर्णय घ्या असे त्यांनी सांगितले होते. विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयात सत्र कर्म पूर्ण न केल्यामुळे डिटेंड झालेला हा बहुदा पहिलाच विद्यार्थ्या असावा.

..........१९८२ मधे सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, मुंबई येथून स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवी प्राप्त केल्यानंतर मी काही काळ उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथे सार्वजनिक बांधकाम खात्यात सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत होतो.

महाराष्ट्र शासनाच्या एका क्रांतिकारी निर्णयाद्वारे, १९८३ मधे महाराष्ट्रात अनेक संस्थांना विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू करण्याची परवानगी मिळाली. श्रमसाधना ट्रस्ट या संस्थेस जळगांव येथे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू सुरू करण्याची परवानगी मिळाली. महाराष्ट्र राज्याच्या समाज कल्याण खात्याच्या मंत्री  असलेल्या मा. प्रतिभाताई पाटील या संस्थेच्या अध्यक्ष होत्या.

प्राचार्य एम जी पाटील व अधिव्याख्याते..... लीलाधर पाटील, मनोज बेंद्रे, सुनील बढे, राजीव चौबे, प्रमोद बोरोले, सतीश महाजन, बोरसे, खंडेलवाल, श्रीमती वारके व मी असे सर्वजण आम्ही ८ऑगस्ट १९८३ रोजी एम जे कॉलेजच्या आवारात दाखल झालो. एम जे कॉलेजचे प्राचार्य डी एस नेमाडे यांचे कडून कॅन्टीन जवळ असलेल्या स्टुडन्ट रूमची चावी घेतली. स्टुडन्ट रूम मधे प्राचार्य व प्राध्यापक कक्ष, नंतर मिळालेल्या तिच्या शेजारच्या रूम मधे कार्यालय, एम जे कॉलेजच्या टाईम टेबल स्लॉटमध्ये रिकामी असतील ते क्लासरूम, प्रात्यक्षिके शासकीय तंत्रनिकेतन जळगांव येथे या पद्धतीने कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ची सुरुवात झाली.

कॉलेज कामानिमित्त मुंबईला गेल्यावर आम्ही मा. प्रतिभाताई यांना मिळालेल्या सेवा सदन  बंगल्यात राहायचो. तिथे जळगाव जिल्ह्यातील अनेक राजकीय नेते व अधिकारी भेटायचे. मी मुंबई येथील युनियन व‌ आयडियल बुक डेपो मधून मोठा डिस्काउंट घेऊन लायब्ररी करिता पुस्तके आणली.  सुनील बढे यांनी अकबर अली स्ट्रीट वरून वर्कशॉप व इतरत्र लागणारऱ्या टूल्सची खरेदी केली, राजीव चौबे यांनी फिजिक्स, केमिस्ट्री या विषयांकरता लागणारे प्रयोगशाळा साहित्य तर खंडेलवाल यांनी लुधियानावरून वर्कशॉप करिता लागणारी मशिनरी खरेदी केली. लीलाधर पाटील यांनी कार्यालयीन कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन आवश्यक फर्निचर, स्टेशनरी खरेदी केली.  

कॉलेज कामकाजा संबंधीच्या आमच्या बैठका मा. प्रतिभाताईंच्या अध्यक्षतेखाली अजिंठा गेस्ट हाऊस, जळगांव येथे व्हायच्या. मॅनेजमेंट कमिटीचे सदस्य असलेले ॲड. आबासाहेब डी एन पाटील, खासदार भाईसाहेब वाय एस महाजन, खान्देश एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. जी डी बेंडाळे, पत्रकार शंभू फडणविस,  अंधशाळा सांभाळणारे मामा वरियानी आवर्जून उपस्थित राहायचे. आम्ही प्राध्यापक मंडळी या बैठकांमध्ये नवीन नवीन कल्पना उत्साहाने मांडत असू. बऱ्याचदा बैठकांत वेगवेगळी मते मांडली जायची. मा. प्रतिभाताई ते सर्व शांतपणे ऐकून घेत असत.

पहिल्या सत्राचा रिझल्ट लागला. तो अतिशय कमी होता. रिझल्ट कमी लागल्यावर तातडीची बैठक बोलविण्यात आली. बैठकीत रिजल्ट कमी लागल्याबद्दलची कारणमीमांसा सुरू होती व याकरिता  प्राध्यापकांना जबाबदार धरण्यात येत होते. चर्चा सुरू असतांना एक सन्माननीय सदस्य We want result by hook or crook असे म्हटले. तेव्हा  त्यांच्या या म्हणण्याला मी स्पष्टपणे विरोध केला. पुणे विद्यापीठातील सर्वच विनाअनुदानित कॉलेजचा रिझल्ट कमी लागलेला आहे. आपल्याकडे कमी मेरिटचे विद्यार्थी आहेत. आम्ही प्राध्यापक मंडळी खूप मेहनत घेत आहोत व पुढेही घेऊ. कॉलेजच्या दीर्घकाळ हिताच्या दृष्टीने काही उपाययोजना करणे गरजेचे आहे, त्या आम्ही जरूर करू असे सांगितले. प्राध्यापकांचे शिकविणे आणि विद्यार्थ्यांचा रिझल्ट यांचा संबंध लावणे योग्य नाही हेही मी सांगितले.

....आता कॉलेज करिता जागा घेऊन, स्वतःची इमारत बांधण्याचे ठरविण्यात आले. त्याकरिता मुंबई येथील नामांकित आर्किटेक ची नेमणूक करण्यात आली. जळगावला लागून असलेल्या परिसरातील साधारणत: २० ते ३० एकर शासकीय जागा शोधण्याची जबाबदारी मी, प्रा. एल. पी.पाटील व जिल्हा परिषदचे डेप्युटी इंजिनिअर चौधरी साहेब यांच्यावर सोपविण्यात आली. त्याप्रमाणे आम्ही तीन जागा शोधल्या. एक नशिराबादच्या अलीकडे असलेली, दुसरी कुसुंब्या जवळ व तिसरी बांभोरी जवळ. जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष असलेले अख्तर अली काझी हे नशिराबाद जवळील त्यांच्या मतदारसंघास लागून असलेल्या जागेबद्दल आग्रही होते. परंतु आम्ही, भविष्याच्या दृष्टीने बांभोरी येथील जागा योग्य राहील असे आमचे मत मांडले. त्यानुसार बांभोरी येथील जागा घेण्याचे निश्चित झाले. जागा ताब्यात घेण्यासाठी एप्रिल मे महिन्याच्या कडक उन्हात मी,  एल पी पाटील व चौधरी साहेब यांनी मिळून प्लेन टेबल सर्वे केला. जागेची बॉण्ड्री निश्चित करून खुणा गाडल्या. कंटूर सर्वे करून नकाशे तयार केले व आर्किटेक्ट कडे सोपविले.

जागा ताब्यात घेण्याचे सर्व सोपस्कार पार पडल्यावर व ती ताब्यात घेतल्यावर भूमिपूजन करून त्वरित बांधकाम करण्याचे ठरले. त्यानुसार साईटवर भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रखरखीत उन्हात, बांभोरी जवळील, एकही झुडूप नसलेल्या या टेकडीवर एक  मंडप टाकण्यात आला. विधानसभेचे उपसभापती असलेले दाजीबा पर्वत पाटील या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मा. प्रतिभाताई पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष होत्या. भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन मी केले. त्यावेळेस,  आजच्या या ओसाड टेकडीवर उद्या नंदनवन फुलणार आहे ही सदिच्छा व्यक्त करून कार्यक्रमाचा समारोप केला.

आज रोजी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी या संस्थेचे मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरुन दिसणारे भव्य प्रवेशद्वार, त्यातील मुख्य इमारतीस लागून असलेल्या विविध विभागांच्या प्रशस्त इमारती, लायब्ररी, प्रयोगशाळा, वस्तीगृहे, मेस, कर्मचारी निवासस्थाने, अंतर्गत रस्ते, क्रीडांगण, झाडे, बगीचा, कारंजे  हे सर्व बघितल्यानंतर येथे खरोखरीच नंदनवन  फुललेले आहे आणि माझे शब्द खरे ठरले आहे याचा आनंद आहे.


Tuesday, September 24, 2024

फक्त आमचेच नसलेले बाबा-३

 


१९७० ते ८० च्या दशकात महाराष्ट्राची राजकीय, सामाजिक, व आर्थिक परिस्थिती कशी होती याचे उत्तम चित्रण अरुण साधू यांनी आपल्या 'मुंबई दिनांक' व 'सिंहासन' या कादंबऱ्यांतून केलेले आहे. त्यांवर जब्बार पटेलांनी 'सिंहासन' नावाचा सिनेमा काढला. अरुण सरनाईक, श्रीराम लागू, निळू फुले यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा खूप गाजला. आजही तो आपल्याला खिळवून ठेवतो.

आर्थिक विषमता, वाढती महागाई, कामगारांचे संप, शेती व शेतमजुरांचे प्रश्न ,दुष्काळी परिस्थिती यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या; त्यांचा मुकाबला करणे हे एक आव्हान होते. मूलभूत गरजा भागविण्यासाठी लोकांना संघर्ष करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर बाबांनी सामाजिक व राजकीय कार्यात स्वतःला झोकून दिले होते.

हतनुर धरण प्रकल्पाचे काम वेगाने सुरू झाले होते. तापी ही मध्यप्रदेशातील बैतूल येथे उगम पाऊन, सातपुड्याच्या दक्षिणेकडून वाहणारी पश्चिम वाहिनी नदी; तिला चांगदेव येथे पूर्णा नदी येऊन मिळते. चांगदेव पासून पश्चिमेला आठ किलोमीटर अंतरावर हातनूर येथे, तापी नदीवर, १३.८ टीएमसी (१३,८०० दशलक्ष घनफूट)  जलसाठा करू शकणारा, हतनुर प्रकल्प हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा प्रकल्प होता. सिंचन, पाणीपुरवठा व वीजनिर्मिती ही प्रकल्पाची उद्दिष्टे होती.

धरणामुळे जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध होणार, आपला भाग सुजलाम सुफलाम होणार, समृद्धी येणार असे सांगितले जात होते. परंतु आपण राहतो ती घरे सोडून जावे लागणार. शेत जमिनी पाण्याखाली जाणार. चरितार्थाचे साधन नष्ट होणार ही भीती असल्याने गावकऱ्यांमध्ये अस्वस्थता होती. या संबंधात गावातील व परिसरातील लोकांमध्ये चर्चा व्हायच्या, बैठका व्हायच्या परंतु निश्चित स्वरूपाची माहिती मिळत नव्हती, नेमके काय करायला पाहिजे या संबंधात निर्णय होत नव्हता. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली धरणग्रस्तांच्या समस्या सुटाव्यात याकरिता वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने व मोर्चे सुरू होते म्हणून बाबा आढावां कडून मार्गदर्शन घ्यावे असे ठरले. त्याप्रमाणे बाबा त्यांना भेटले. त्यांच्याकडून धरणग्रस्तांच्या समस्यां संबंधी शासनाकडे दिलेली निवेदने, केलेला पाठपुरावा, प्रकल्पग्रस्तां विषयीचे  शासन निर्णय, वृत्तपत्रातील लेख, पुस्तके  मिळविली. त्याचा सखोल अभ्यास केला. कोयना धरण परिसरात जाऊन तेथील लोकांकडून प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, शेतीला मिळालेला मोबदला, प्रकल्पग्रस्तांना शासकीय सेवेचा लाभ याविषयी वस्तुनिष्ठ माहिती घेतली. त्या वेळेस बाबांच्या असे लक्षात आले की महाराष्ट्रातील अनेक प्रकल्पांचे अजूनही पूर्णपणे पुनर्वसन झालेले नाही. भूसंपादित केलेल्या जमिनीचा पूर्णपणे मोबदला मिळालेला नाही. अनेक प्रकरणात न्यायालयात दावे प्रलंबित आहेत. पुनर्वसन झालेल्या गावांमध्ये पुरेशा सोयी उपलब्ध नाहीत.

या पार्श्वभूमीवर हातनुर धरणग्रस्तांचे योग्य रीतीने पुनर्वसन व्हावे याकरिता बाबांनी, श्रीरामकाका चौधरी, युवराजकाका पाटील, देवरामभाऊ पाटील, विश्वनाथजी बोदडे या सहकाऱ्यांसोबत काम करायला सुरुवात केली. पुनर्वसनाचे काम अतिशय जिकरीचे असून त्याकरिता शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधींच्या भक्कम पाठिंब्याशिवाय हे शक्य होणार नाही याची जाणीव सर्वांना व्हायला लागली. श्रीमती प्रतिभाताई पाटील विधानसभेत एदलाबाद तालुक्याचे प्रतिनिधित्व करीत होत्या व महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री होत्या. चांगदेवचे त्र्यंबक भाऊ चौधरी एदलाबाद तालुका काँग्रेस समितीचे अध्यक्ष होते. तेव्हा सर्वांनी विचारविनिमय करून बाबांनी प्रतिभाताईंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश करून, काम करावे असे ठरले.

आता बाबांनी हतनुर धरणग्रस्तांच्या पुनर्वसनावर लक्ष केंद्रित केले. सर्वात महत्त्वाचे पहिले काम म्हणजे त्यांनी गावातील लोकांना खाते फोड करायला सांगितले व त्यात त्यांना मदत केली, जेणेकरून कुटुंबातील  सदस्यांना स्वतंत्ररित्या प्लॉट मिळतील. जुन्या चांगदेव गावात लहान लहान घरे होती. काही वाडे होते. वाड्यांना बुरुज व तटबंदी होती. गावातील घरांचे मूल्यांकनाचे काम इंजिनिअर भामरे साहेबांकडे होते. तटबंदी व  बुरुजांना वाड्याचा भाग समजून, त्याप्रमाणे त्यांचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे हे त्यांना पटवून सांगितले. पुनर्वसनात सगळ्यांना मोठे प्लॉट कसे मिळतील ते पाहिले. रस्ते, गटारी, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशु दवाखाना, ग्रामपंचायत, वि का सोसायटी, समाज मंदिरे यांच्या करिता प्रशस्त जागा मंजूर करून घेतल्या. पुनर्वसन आराखडा मंजुरीचे काम जळगांव येथील टाऊन प्लॅनिंग डिपार्टमेंटकडे होते. त्यात इंजिनियर असलेल्या लता जगताप यांची या कामात मदत झाली. पुढे माझे त्यांच्याशी लग्न झाले, हा योगायोग.

बाबांचे कार्य बघून त्यांची जिल्हा काँग्रेस समितीच्या सरचिटणीस पदावर नेमणूक करण्यात आली. त्यामुळे त्यांना अधिक मोठे कार्यक्षेत्र उपलब्ध झाले. ते जळगाव येथील काँग्रेस भवनच्या वरच्या मजल्यावर राहायचे. बाहेर गांवावरून आलेल्या कार्यकर्त्यांकरिता चहापाण्याची व्यवस्था होती. जेवण ते स्वतः बनवायचे. पत्रकारांचे त्यांना नेहमी सहकार्य मिळायचे. महाराष्ट्र टाईम्सचे मुरलीधर ढमाले, टाइम्स ऑफ इंडियाचे श्रीकांत जळूकर, बातमीदारचे शरद नेहते, जनशक्तीचे ब्रिजलालभाऊ पाटील, साप्ताहिक मधुविचारचे स्वामी रेणापूरकर, प्रेस फोटोग्राफर सिताराम साळी यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. राजकीय व सामाजिक जीवनातले अनेक बारकावे त्यातून त्यांना समजायचे.

या काळात आमच्या कुटुंबाच्या, विशेषत: माझ्या बाबतीत एक महत्त्वाची घटना घडली. १९७६ मध्ये मी दहावीची परीक्षा दिली होती. परीक्षेचा निकाल लागण्याच्या आदल्या दिवशी, वृत्तपत्रांमध्ये बोर्डाचे मानकरी या सदरात, 

'महेंद्रनाथ विश्वनाथ इंगळे 

एदलाबाद तालुक्यात प्रथम

मानसिंगराव जगताप पारितोषिक रुपये २५१ प्राप्त',  अशी बातमी छापून आली. जळगाव आयटीआय मधे शिकणाऱ्या चांगदेवच्या विद्यार्थ्यांनी बाबांना ही वृत्तपत्रे संध्याकाळी एसटी स्टँड वर आणून दिली व त्यांचे अभिनंदन केले. रात्री साधारणत: साडेआठ वाजता बाबा घरी परतल्यानंतर, त्या दिवशी वीज नसल्याने, कंदीलाच्या प्रकाशात वाड्यातील सर्वांनी ही बातमी पुन्हा पुन्हा वाचली. प्रतिकूल परिस्थितीत मी ही परीक्षा दिली होती. चांगदेव येथे परीक्षेचे केंद्र नव्हते. ते जे ई स्कूल, एदलाबाद येथे होते. आम्ही सात आठ मुले मुली ट्रॅक्टरमध्ये बसून रोज परीक्षेला जात असू. जे ई स्कूल व्यतिरिक्त कोणी विद्यार्थी यापूर्वी तालुक्यातून प्रथम आलेला नव्हता. त्यामुळे माझे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणे ही एस बी चौधरी हायस्कूल, चांगदेव व गावातील सर्वांकरता अभिमानाची गोष्ट ठरली. या घटनेचा माझ्यावर मोठा परिणाम झाला. आपण वेगळे आहोत ही भावना माझ्यात निर्माण झाली. वाचलेल्या पुस्तकांमधील चरित्र नायकांप्रमाणे, आपण एक दिवस मोठे व्यक्ती होऊ असा विचार माझ्या मनात येऊ लागला.

(क्रमशः)

प्रा. डॉ. महेंद्र इंगळे, जळगांव

Ratan Tata: Value-Centred Leader

  "I admire people who are very successful. But if that success has been achieved through too much ruthlessness, then I may admire that...